आजोबाचे मरण..

Started by विक्रांत, September 18, 2014, 03:02:30 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



त्या एका वर्षी खूप पाऊस पडला
दुष्काळ संपला अन माझा आजोबा 
आषाढातील एका ओल्या संध्याकाळी
अवसेच्या आधी जग सोडून गेला
चार वर्ष पावसाविना सरली होती
केलेली सारी मेहनत वाया गेली होती
तरीही मनावर दगड ठेवत अन
हातावर आपल पोट सांभाळत
त्यांनी जगून काढली होती. 
खूपच काटक म्हातारा
पंच्याहत्तरी पार केलेला
उन्हात रापलेला शेतात खपलेला
काहीसा खंगलेला काहीसा वाकलेला
तरीही जिवट आणि चिवट
बाभळीसारखा टिकून राहिलेला .
मरायच्या आधी त्याला पहायची होती
हिरवीगार शेती भरलेली नदी
शेताच्या बाजूचा उधानला ओढा .
त्या वर्षी खूप पाऊस पडला
अन तो आजारी पडला
झरणाऱ्या प्रत्येक नक्षत्रा बरोबर
त्याचा जीव उतावीळ होत होता
शेतात जायला शेत पाहायला
पण म्हातारी आजी त्याला
जबरदस्तीने अडवून ठेवत होती
ताकद येऊ द्या,बरे वाटू द्या,
मग जा ..असे म्हणत होती
आता तो मनानेच
पिकाची उंची मोजत होता
विहारीचे पाणी जोखत होता
आजी कडून पुन:पुन्हा
खात्री करून घेत होता
त्याच्या डोळ्यात ख़ुशी होती
चेहऱ्यावर तृप्ती होती
दरवर्षी पोळ्या आधी उत्साहाने
भरलेला हौशी आजोबा
त्या आदल्या दिवशी
अंथरुणावरून हलूही शकत नव्हता
त्या संध्याकाळी बाबांच्या हातून
त्याचा आवडता चहा तो प्यायला
अन बाबा शेताच्या वाटेला लागे पर्यंत
देह सोडून शेतावर पोहचला देखील
दुष्काळानंतर बहरलेले शेत बघायला ..


विक्रांत प्रभाकर