बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

सुगंधित झाले

वन सर्व सुगंधित झाले
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

मी सारे वन हुडकीले
फुल कोठे नकळे फुलले - मज तरी
स्वर्गात दिव्य वृक्षास
बहर ये खास
असे क्ल्पीले - असे क्ल्पीले
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

परी फिरता फिरता दिसले
फुल दगडाआड लपाले - लहानसे
दिसण्यात फार ते साधे
परी आमोदे
जगामधी पहिले - जगामधी पहिले
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

मी प्रेमे वदलो त्यासी
का येथे दडुनी बसशी - प्रिय फुला?
तू गडे फुलांची राणी
तुला गे कोणी
रानी धाडिले- रानी लावीले?
मन माझे मोहुन गेले - कितीतरी

ते लाजत लाजत सुमन
मज म्हणे थोडके हसुंन - तेधवा
निवडले प्रभूने स्थान
रम्य उद्यान
तेच मज झाले- तेच मज झाले
मन माझे मोहुन गेले- कितीतरी

- ना. वा. टिळक

MK ADMIN

टप‌ टप‌ पडती अंगावरती

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर‌ भिर‌ भिर‌ भिर‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

- मंगेश पाडगावकर

MK ADMIN

पावसाच्या धारा येती झरझरा...

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले
धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली


कवयित्री - शांता शेळके

MK ADMIN

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

- नारायण सुर्वे

MK ADMIN

सदैव सैनिका, पुढेच जायचे

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे
सदैव सैनिका, पुढेच जायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे
सदैव सैनिका, पुढेच जायचे

- वसंत बापट

MK ADMIN

माझी बाहुली

लहान माझी बाहुली
मोठी तिची साऊली
घारे डोळे फिरवीते
नकटे नाक उडवीते
फुसके गाल फुगवीते
दात काही घासत नाही
तोंड काही धुवत नाही
तसेच घरकुल मांडीते
मांडता मांडता पाडीते

भात केला कच्चा झाला
वरण केलं पातळ झालं
पोळया केल्या करपून गेल्या
तूप सगळं सांडून गेलं
असे भुकेले नक्का जाऊ
थांबा करते गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
पडले दोनच दात
आडाचं पाणी ओढायला गेली
धपकन पडली आत

(कवी माहीत नाही)

MK ADMIN

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया

- विद्याधर सीताराम करंदीकर

MK ADMIN

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे जडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥


रचना - संत ज्ञानेश्वर

MK ADMIN

संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा

दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी

भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदणे ओले
थिबके पाण्यावरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणामधुनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मनाचा गाभारा

- मंगेश पाडगांवकर

MK ADMIN

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी

गुजे आरुणि जाणुनी त्या ऊषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारीते काय विणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर

कीती उंच जावे कीती सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी

कीती उंच जाईन पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी

पद्मा गोळे