मायानगरी
खरे तर या महानगरीत मरण किती स्वस्त
अपघात आजार विषबाधा यादी नाही संपत
कोणाची दादागिरी कोणाची घोषणाबाजी
जगण्यासाठी करावी सगळ्यांची हांजीहांजी
भरण्यासाठी पोटाची खळगी मोहनगरीत आलो
निवाऱ्यासाठी या झोपडपट्टीत शिरलो
गावी खाऊनपिऊन सुखी असतो
तर असे देशोधडीला लागलो नसतो
या कच्च्याबच्च्यांना जगवण्यासाठी
सोडायला लागली गावची माती
या मायानगरीत कुठे तशी माती
असलीच तर नाहीत तिला नाती
आता अन्नवस्त्र निवाऱ्यासाठी
हे रोजचे झगडणे आहेच---
आणि मरणं कितीही सोपं असलं- --
तरीही जगण आहेच---!
-----------