हे कमॉन सुनीता - एवढे काही सिरीयस होऊ नकोस. कविता खूप सोप्पी असते, तशीच खूप अवघडही असते. आपल्याला अपिल होते ती कविता.
मलाही कुठे हे छंद, वृत्त, मात्रा माहितीएत - म्हणून तर मी बालकविता जास्त लिहितो - ज्यात फक्त एंटरटेनमेण्टच असते.
आता ही कविता बघ - सध्याचा खूप आघाडीचा कवि, गीतकार आहे - पण ही हलकी फुलकी पण अपिल होणारी कविता कशी सुरेख लिहून गेलाय....
बाकी काही नाही .......... (सुप्रसिद्ध कविवर्य श्री. वैभव जोशी)
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
रस्त्यामधे दिसतातच की चेहरे येता जाता
"एका"सारखे दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढून एसेमेस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही......