राजकारण (कवी: सचिन निकम. मुक्तस्पंदन)
विनाकारण केले जाते त्याला राजकारण म्हणतात,
कारणासाठी काहीही न करणे यालाही राजकारण म्हणतात.
राजकारण नसते तर काय महाभारत घडले नसते?
राजकारण असते तर काय रामायण अडले असते?
जगण्याच्या शर्यतीत कोण कुणाला ढकलतो
कुणाची तंगडी कोण बरे खेचतो
उगीच कुणाचा चिमटा का काढतो
तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ कसा दाखवतो
आयुष्याच्या करंजीत काय कमी होते सारण?
दिसते तसे नसते असते फक्त राजकारण.
कधी कोण कुणाला येईल शरण
कधी कोण कुणाचे करेल वस्त्रहरण
तिकीट मिळाल्याशिवाय येईल कसे मरण
अडला हरी धरी गाढवाचे चरण
सुसुंस्कृत समाजाला हवय कशाला राजकारण?
द्युताचे पडती उलटे सुलटे फासे
खाऱ्या पाण्यात पोहती गोड्या पाण्यातले मासे
बुद्धीबळाच्या पटावरचा राजा का घाबरतो?
तिरक्या चालीने उंट का चालतो?
सरळ रेषेत चालूनही प्यादा का मरतो?
सर्वशक्तीयुक्तीनिशी वजीर का लढतो?
नेत्रपटलांवर दूरदृष्टीचा पडल्यावर किरण
जिंकण्यासाठी परत शस्त्र बनते राजकारण.
ज्याची सत्ता त्याला मिळे भत्ता
विकासाच्या आराखड्याचा नाही थांगपत्ता
हडपली जनतेची सारी मालमत्ता
आश्वासनांच्या गाजरांचा कुंटला खलबत्ता
व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितकी धोरण
येरागाबाळ्याचे काम नव्हे हे राजकारण.
Watch the full video on the YouTube channel "Skrinz Studios Music".