जाणिवा

Started by शिवाजी सांगळे, May 24, 2015, 04:55:10 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जाणिवा...
       
        माणुस मोठा झल्यावर जाणिवा वाढतात कि जाणिवा वाढल्यावर माणुस मोठा होतो? माझ्या साठी कायम अनुत्तरीत राहिलेला हा प्रश्न, निमित्त झालं अाजोळी एका लग्न समारंभात जाणं. मी पत्नी व मुलासह गेलो होतो, लग्न समारंभ म्हणजे बरेच आप्तेष्ट व नातेवाईक हजर होते. जे जे कुणी ओळखीचे म्हणून वाटत होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी सुरू होत्या. सारेजण एकमेकांची आपुलकीने विचारपुस करीत होते.

        गप्पा सुरू असतांना वेळेच्या चाकोरीतुन भेटी हुकलेल्या, निसटलेल्या नातेवाईकांची पत्नी व मुलास ओळख करून देतांना मी चांगलीच गफलत करीत होतो, कुणाला मावशी ऐवजी मामी, काका ऐवजी मामा वगैरे सांगुन नात्यांच्या ठेवणीत घोटाळे करीत होतो. ज्यांच्या सोबत ही गडबड झाली त्यांनीही हे सारं हसून समंजसपणे घेतलं.

             त्या प्रसंगी एक जाणवलं ते म्हणजे नात्यां मधील आपुलकीचा अतुट स्नेह. परंपरे नुसार अंगवळणी पडलेला संस्कार, जो आजही मोठ्यां व वयस्कर लोकां पुढे नमस्कारासाठी न चुकता वाकवतो.
           
           स-यांच्या गर्दीत बालपणचे बरेच सवंगडी सुध्दा दिसले काही भेटले तर काहींना जाउन भटलो, कुणी तब्बेतीने गांजलेल, थकलेले कुणी थोडे सुटलेले, कुणी संसार सुख मानवलेले, विशेषत: बाल मैत्रिणी, त्यातील काही आपण होउन समोर आल्या तर काहिंच्या समोर गेलो.... सर्वजण भेटल्यावर सहाजिकच जुन्या आठणींला उजाळा मिळत गेला आणि आम्ही त्या आठणींत हरवत गेलो....   

          दुभत्या बकरया पकडून छोट्याशा लोटीतून एकमेकाचं उष्ट दुध पिणं, कुणाच्या तरी घरून मोठ्यांच्या नकळत मिठ मसाला आणुन कोणाच्याहि मालकीच्या झाडांवर चढुन कच्च्या कै-यांचा फडशा पाडणं, नदिच्या वाटेवर करवंदाच्या जाळीत शिरून अंगाला ओरखडे येईस्तोवर करवंद खाणं, तेच हाल जांभळाचे, झाडावर दगड मारतांना कुणाच तरी डोकं फुटल्यवर उडालेली सगळ्यांची घाबर गुंडी, कोणता मामा चांगली गोष्ट सांगतो त्याचा पिच्छा न सोडणं आणि त्यालाच दुसरया दिवशीच्या आईसफ्रुट साठी मामा बनवणं इत्यादि सर्व गमती, किस्से वगैरे ऐकूण व आमची तल्लिनता पाहुन पत्नी व मुलाला मजा वाटत होती....

         खुप वर्षांनी झालेल्या भेटीं गाठीं पेक्षा संसाराच्या दुनियादारीत राहून सुध्दा काहींच्या जाणिवा बदलल्या नव्हत्या, मुळ स्वभाव तसाच होता म्हणून जुन्या आठवणींत रमलो होतो, पुन्हा पुन्हा लहान होत होतो. कदाचित आजच्या पिढीच्या तोंडून अशा काही गोष्टी आम्हाला ऐकावयास मिळत नसाव्यात म्हणून आम्ही लहान झालो होतो.

          आमच्या पैकी काहि मंडळी चांगल्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर आहेत, काहि यशस्वी व्यावसायिक आहेत तर काहिंची बेतास बात आहे, त्या पैकी काही इतरां पासून दुर दूर रहात होते आणि होत्या सुध्दा.

          का म्हणुन मोठेपणाच्या वा न्युनगंडाच्या जाणिवा सतत जोखडा सारख्या मानेवर, मनात ठेवुन रहायचं? हे मान्य कि परिस्थिती वेळेला कुणालाच काही सुचु देत नाही ती आपल्या रेट्यात सगळ्यांनाच ओढत नेते.

          न्युनगंडाच्या, कमीपणाच्या जाणिवांबाबत एकवेळ समजु शकतो त्या जाणिवा माणसाला बदलवतात किंबहुना बदलायलाच भाग पाडतात परंतू मोठेपणाच्या जाणिवांच काय? त्याहि बदलवतात माणसांना अहंकाराची शाल घेऊन?  खर तर असं होवु नये संसारीक अडचणी तशा सर्वांना असतात, त्याही पलीकडे ब-याच गोष्टी असु शकतात, म्हणुन कुणी जगण्याचे नियम ठरवू नयेत अस मला वाटतं, परीस्थिती कायम तशीच रहात नाही, ती बदलणारी असते परीवर्तन घडविणारी असते आणि त्यानुसार जगण्याचे निकष बदलत रहातात, व जगण्याची उमेद वाढवितात, म्हणुनच जीवन हे सुंदर आहे.
           समारंभ ठरल्या प्रमाणे पुढे सरकत होता, कुणी मुला मुलीं साठी स्थळं चाचपत होते. कुणी मुलांच्या नोकरी व्यवसायाठी फिल्डींग लावित होते. आमची एक बाल मैत्रिण जेवणाच्या टेबलावर इकडे तिकडे पहात होती, बहुतेक तीच्या मुलांची लग्नकार्ये उरकली असावीत तरीही छान दिसत होती. नजरा नजर झाली, अस्पष्ट ऐकू आलं "कसा आहेस...?, ओळखलस का?" मी होकारार्थी मान हलवली आणि हसत म्हटलं भेटु थोडयाच वेळाने, आधी जेवण करून घेवु.

        भेटीगाठी दरम्यान मी तीला विसरूनच गेलो, दुरवरून पुन्हा नजरा नजर झाली, कदाचीत तीला बोलायची इच्छा असावी... नजरेतुन वाटत होतं तीच्या पण का कोण जाणे ती पुढे नाही आली आणि मी पण सामोरा नाही गेलो... माझा अहंकार जागा झाला होता कि काय तेंव्हा? समजलं नाही, हे खरं. खैर तो विषय तेंव्हाच लोप पावला... आता केंव्हा तरी अचानक आठवण होते... हे खरं!

         असाच काहिसा प्रकार आणखी एकाच्या बाबतीत घडला, जो सुध्दा तसा कष्टातुन, मेहनत करून पुढे आलेला, हल्ली सरकारी नोकरीत ब-या हुद्धावर असलेल्या त्याला होऊन भेटायला गेलो तर वर वर बोलला... अगदी सरकारी जी.आर. सारखा भावनेचा लवलेश, स्पर्श नसलेलं... वाईट वाटलं... त्याही पेक्षा जास्त वाईट वाटलं ते हया गोष्टीचं कि माणूस का असं करतो? व्यवहारी जगातले सारेच नियम वैयक्तिक जीवनात का वापरतो? ते  वापरू नयेत अस मला वाटतं. कुठ गेल ते बालपणीचं एकत्र खेळणं? न विसरण्याच्या शपथा घेणं? संसारीक, व्यवहारी जाणिवा एवढ बदलवतात माणसाला?

         काय आणतो आपण सोबत? ना कपडे,ना संपत्ती, ना मानमरातब, नाती चीकटतात नंतर, वेगवेगळया लेबलची आपल्यात गुरफटुन घेणारी नविन जीवाला त्याच्या  मुळ नैसर्गिक स्वभावाला बदलवुन व्यवहारी दुनियेत दुनियादारी करायला लावणारी. कीतीही पुढारलो, शिकलो तरी आतला अहंकार सुटत नाही ज्यांचा सुटतो ते संत पदाला गेले सामान्य स्वतः पलिकडे विचार करू शकत नाहीत.
       
         जाणिवा चांगल्या असोत कि वाईट त्या झाल्या काय किंवा बदलत्या, वाढत्या वयानुसार  आल्या काय? स्वभाव चांगला असणं महत्वाच. जो  व्यक्तीत बदल घडवत जातो, जाणिवांच अस्तित्व दाखवित असतो, हे सत्य सुध्दा नाकारता येणार नाही.

= शिवाजी सांगळ॓ मो. +९१ ९४२२७७९९४१/+९१ ९५४५९७६५८९ ई.मेल.sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९