"गुरु पौर्णिमा" - लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, July 23, 2021, 12:52:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "गुरु पौर्णिमा"
                               लेख क्रमांक-१
                              --------------
मित्र/मैत्रिणींनो,

     आजच्या म्हणजे दिनांक-२३.०७.२०२१ च्या पावन पर्वावर, जगत गुरु, जगत महा-चिंतक, व जगत संत- श्री श्री रवी शंकरजींच्या मते खरी गुरु-पौर्णिमा काय आहे, आणि ती कशी साजरी करावी, हा लेख मी तुम्हासमोर त्यांच्याच शब्दांत ठेवत आहे.

     "श्री श्री रविशंकर"
    ----------------- 
    "यंदाची गुरु पौर्णिमा तुम्ही स्वत: साजरी करा"-----------------

    आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात. मन चंद्राशी जोडलेले असते. आणि पूर्ण चंद्र हा पूर्णतेचे, उत्सवाचे, कळसाचे प्रतिक आहे. ह्या दिवशी आपण ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकत्र साजरे करतो. पूर्णचंद्र हा प्रेम आणि ज्ञानाचे प्रतिक आहे. हा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील जमा खर्चाचे प्रतिबिंब आहे.आत्तापर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पुढील वर्षांमध्ये जे काही करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा दिवस आहे. या सर्वांची जाणीव होणे आणि जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटून, हे सर्व आणि ज्ञान ज्या गुरुपरंपरेने जतन केले त्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजे गुरु पौर्णिमा.

     आपल्याला आपल्या जीवनात कृपेचा ओघ वाढल्याचे जाणवते. जास्त कृतज्ञता म्हणजे जास्त कृपा. जास्त कृपा म्हणजे जास्त आनंद, जास्त ज्ञान. ही परंपरा कधी सुरु झाली ते कोणालाही माहीत नाही. या पृथ्वीवर लाखो वर्षांपासून अनेक ऋषी आणि संत होऊन गेले, भविष्यातही अनेक होतील. आपण त्या भूतकाळातल्या, सध्याच्या तसेच भविष्यात होणाऱ्या सर्वांचे ज्ञानाचा स्रोत चालू ठेवण्याबद्दल आपण आभार मानतो. आध्यात्मिक ज्ञानाने आपल्या जीवनात झालेले परिवर्तन बघून आपल्याला कृतज्ञ वाटते.

     ज्ञानाशिवाय, सुज्ञपणाशिवाय 'जगणे' होत नाही तर फक्त 'अस्तित्वात आहे' असे होते. ज्ञानाने जगणे सुरु होते. गुरु म्हणजे अति भव्य, सर्वात मोठा. आपल्या चेतनेत जेव्हा गुरुतत्व येते तेव्हा जीवनात ज्ञान, विवेक येतो. जेव्हा सर्व परिसीमा गळून पडतात, भोवतालच्या सर्वांबद्दल एकत्व वाटते आणि संपूर्ण विश्वाबद्दल एकत्व वाटते तेव्हा त्याला गुरुतत्व म्हणतात. जेव्हा आपण पूर्णपणे निरिच्छ होऊन जातो तेव्हा जीवनात गुरुतत्वाचा उदय होतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्यासाठी काही करावे असे कधी तरी वाटते कां ? मग तुम्ही गुरुची भूमिका बजावली आहे.

    आई ही सर्वात पहिली गुरु असते. त्यानंतर शिक्षक, जसे वीणा शिकवणारे शिक्षक वगैरे. सद्गुरू तुम्हाला सत्याचे पराकोटीच्या वास्तवाचे, आध्यात्मिक ज्ञान देतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने याचे चिंतन करायला हवे की, " हे ज्ञान मिळायच्या आधी मी कुठे होतो? आता मी कुठे आहे?" पूर्वी या ज्ञानाशिवाय तुम्ही कुठे होतात यातले वैधर्म्य लक्षात आले की कृतज्ञता भाव येतो. तुम्ही किती नशीबवान आहात की या शरीर-मन संकुलाच्या सीमित अशा चौकटीत तुमच्यातील अनंतत्व तुम्हाला जाणवले. शरीर मन सीमित आहेत पण आत्म्याची अभिव्यक्ती असीम आहे.

     साधकासाठी गुरुपौर्णिमा म्हणजे नवीन वर्षाची सुरवात असते कारण एक संपूर्ण वर्ष अध्यात्मिक मार्गावर असण्याचा, दिव्यत्वाच्या अभिव्यक्तीचा तो एक उत्सव असतो. एकत्व वाटण्याचे आणि गुरुच्या नजरेने जग पाहण्याचे एक वर्ष. तो आपल्यासाठी एक मार्गदर्शक तारा आहे. एखाद्या गुरूने, सूज्ञ माणसाने अशा परिस्थितीत जे केले असते ते मला करू द्या. सूज्ञ व्यक्ती कधीही प्रतिक्रिया देत नाही तो प्रतिसाद देतो. गुरु किंवा सूज्ञ व्यक्तीच्या जागी स्वत:ला पुन्हा पुन्हा ठेऊन तुम्ही शिकू शकता – असीम संयम ठेऊन, अतिशय हुशारीने, संपूर्ण करुणेने आणि निर्लेप आनंदाने. आपण दुसऱ्यांवर निरपेक्ष प्रेम केले पाहिजे आणि निरपेक्ष सेवा केली पाहिजे,हे महत्वाचे आहे. आपण काय विचार करतो की मी या व्यक्तीसाठी इतके केले त्या बदल्यात त्याने मला काय दिले ? अशाने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला अशी जाणीव करून देता की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यावर मोठे उपकारच केले आहेत. आपण असे करता कामा नये. प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. हे सन्मानाने, नैसर्गिकपणे, करुणेने आणि साधेपणाने वागणे आहे. आणि आपल्यात जन्मत:च हे गुण आहेत. तुमच्यातील सर्व गुण समर्पित करा आणि पोकळ आणि रिक्त होऊन जा. गुरुतत्वाच्या आणखी जवळ येण्यासाठी तुम्हाला हेच करायला हवे. तुमचे सर्व चांगले-वाईट गुण समर्पित करा.

     (साभार आणि सौजन्य - "श्री श्री रविशंकर")
    ----------------------------------------

-----(संकलन)
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.07.2021-शुक्रवार.