II श्रावणी गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा II-(श्रावणी गुरुवार-लेख)

Started by Atul Kaviraje, August 12, 2021, 02:41:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     II श्रावणी गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा II
                    ------------------------------------
                               (श्रावणी गुरुवार-लेख)
                              ---------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी गुरुवार. ऐकुया तर या दिवसाचे महत्त्व, माहिती, व्रताचरण आणि व्रतकथा. मराठी कवितेतील, माझ्या सर्व कवी बंधू आणि कवयित्री भगिनींना श्रावणी गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा.


            बृहस्पती व्रताचरण, महत्त्व, व्रतकथा आणि मान्यता:-----
          ---------------------------------------------

     चातुर्मासात हिरव्या कच्च परिसरावर आरसपानी थेंबांचे आभाळ घेऊन झरझरणारा श्रावण हा पहिला महिना. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. श्रावणातील  गुरुवारी बृहस्पती पूजन केले जाते. जाणून घ्या...

    चातुर्मासातील व्रत-वैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन, आदित्य राणूबाई पूजन यांप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जिवतीचा कागद देवघरात चिकटवून त्याची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. बृहस्पती पूजन कसे करावे? याची व्रतकथा काय? जाणून घेऊया...

     महाराष्ट्रासह देशाच्या अन्य काही राज्यांमध्ये २१ जुलै २०२० पासून श्रावण सुरू आहे. यामध्ये २२ जुलै, २९ जुलै, ५ ऑगस्ट व १२ ऑगस्ट रोजी बुधवार, तर २३ जुलै, ३० जुलै, ६ ऑगस्ट व १३ ऑगस्ट रोजी गुरुवार येत आहे. या दिवशी बुध-बृहस्पती पूजन केले जाऊ शकते.

                     बृहस्पती व्रताचरण:-----
                    ------------------

     बृहस्पती व्रतासाठी  गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते. दररोज घरातील देवतांची जशी पूजा केली जाते, तशीच साधी पूजा करावी. शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो जिवतीचा कागद चिकटवला जातो, त्यात बृहस्पतींचे चित्र रेखाटण्यात आले आहे. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे, अशा बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल, त्यांनी ते करावे. शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. निदान एखादे फूल, एखादे पुस्तक द्यावे.

                     बृहस्पती व्रतकथा:-----
                    -----------------

     या व्रताची एक कथा पुराणांमध्ये सांगण्यात आली आहे. एका राजाला सात सुना होत्या. त्याच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी सहा सुना, आम्ही कामात आहोत त्यामुळे आमचे हात रिकामे नाहीत, असे सांगून त्यांना घालवून देत असत. काही काळ गेल्यानंतर त्या राजाचे राज्य गेले. परिणामी बघता बघता ऐश्वर्य जाऊन दारिद्र्य आले. त्यांच्यापैकी सर्वांत लहान सुनेने त्या मामा-भाच्यांची योग्यता जाणली होती. तिने या मामा-भाच्यांची सर्व कुटुंबीयांच्यावतीने क्षमा मागितली. पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत, म्हणून उपाय विचारला. त्यावेळी त्यांनी हे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. याच व्रतकाळात परराज्यात गेलेल्या तिच्या पतीच्या गळ्यात त्या देशीच्या हत्तीने अचानक फुलमाला घातली. त्यामुळे त्या राज्याच्या प्रजेने त्याला आपला राजा केले. काही काळानंतर या सात सुना आणि त्यांचे पती कामधंदा शोधत हिंडत या नव्या राज्यात आले. धाकट्याने आपल्या पत्नीला, मुलांना आणि भावंडांना ओळखले. मग ते सारे तिथेच पुन्हा वैभवात आनंदाने राहू लागले. धनसंपत्ती आणि बुद्धिमत्ता मिळावी म्हणून हे व्रत केले जाते.

                     (संकलक - देवेश फडके)
                    ------------------------ 

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम)
            ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2021-गुरुवार.