"नवरात्रोत्सव"-दिवस आठवा-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 14, 2021, 12:30:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          "नवरात्रोत्सव"
                                           दिवस आठवा
                                             रंग गुलाबी
                                           लेख क्रमांक-2
                                       ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१४ .१०.२०२१ -गुरुवार , नवरात्रीचा आठवा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र सणाचे  पूजा  विधी , कथा , आणि  इतर  माहिती . (आजच्या दिवसाचा रंग गुलाबी आहे.)

                       नवरात्रीची पौराणिक कथा----

     नवरात्र नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या दोन पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासुर नावाचा एक दैत्य ब्रम्हदेवाचा भक्त होता. त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रम्हदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाःकार माजवायला सुरूवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. नऊ दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा दहाव्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला 'महिषासुर मर्दिनी' असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. नऊ दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींंशी लढा देण्यासाठीच नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते.
तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. नऊ दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होतो. त्यानंतर देवीने लंकाविजयचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. नवरात्र माहिती मराठीत जाणून घेणेही गरजेचे आहे.

                       नवरात्रौत्सवातील पूजा विधी----

     शारदीय नवरात्रौत्सव सहसा ऑक्टोबर महिन्यात येतो. आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. तर देवीला वेगवेगळ्या नऊ रंगांचे वस्त्र नऊ दिवस परिधान करण्यात येते.

     यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात नऊ प्रकारचे धान्य पुरण्यात येते. दहा दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. पूजेमध्ये पाच प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज नऊ दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर सकाळी संध्याकाळी धूप – दीप – आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. हा दिवस सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. नऊ कुमारिकांचे त्यांचे पाय धुऊन आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजन करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येतो. कोणतीही नजर लागली असेल अथवा वास्तूमध्ये कोणताही त्रास असेल तर होमहवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा करण्यात येते. तर नऊ दिवस भोंडला खेळून देवीचा जागरही केला जातो. दरम्यान काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो. अष्टमीला हा कार्यक्रम योजला जातो. ही घागर त्यामध्ये उदाच्या धुपाने भरली जाते आणि पाच वेळा फुंकली जाते. यामुळे श्वसनमार्ग शुद्ध होतो असे समजण्यात येते.

                             देवीची ओटी----

     नवरात्रौत्सवात देवीची ओटी भरणे हादेखील एक महत्त्वाचा भाग असतो. पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्की काय आहे आजकाल अनेक जणींना माहीत नसते. नवरात्रीच्या माहितीसह हीदेखील माहिती जाणून घ्या.  देवीला या नऊ दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते. या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते. म्हणून ही प्रथा आहे. त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये ही साडी, त्यावर खण आणि नारळ ठेऊन हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्यादेवीकडून आपल्याला अधिकाधिका उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते. तांदूळ हे सर्वसमावेशक असतात. चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहचविण्याचे काम करतात. म्हणूनच ओटीमध्ये तांदळाचाही समावेश करण्यात येतो.

--लेखिका - दीपाली नाफडे
  -----------------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .पॉप xo.कॉम)
              -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.10.2021-गुरुवार.