लेख संग्रह-ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन--लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:42:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "लेख संग्रह"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दीपक साळुंके, यांच्या "लेख संग्रह" या ब्लॉग मधील एक संग्रहित  लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन"

                 ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन--लेख क्रमांक-3--
                ----------------------------------------------

     १९४२ च्या लढय़ात उल्लेखनीय कामगिरी बजावली सातारा जिल्ह्य़ातील ग्रामीण महिलांनी. साताऱ्यात पत्री सरकारचे दोन गट होते. वाळवे गट व कुंडल गट. ही नावे त्या- त्या गावांवरून पडली होती. दोन्ही गटांचे काम एकच होते. वाळवे गटात राजमती बिरनाळे ऊर्फ जैनाची ताई हिने वाळवे तालुक्यातील दरोडेखोरांनाही धडा शिकवला होता. जैनाची ताई बंदूक चालवे. धुळे खजिना लुटीशीही तिचा प्रत्यक्ष संबंध होता. कुंडल गटाने तुफान सेना नावाची सेना तयार केली होती, तर वाळवे गटाने आझाद हिंद फौजेतील दोन जवान प्रशिक्षक म्हणून नेमून आझाद हिंद सेना तयार केली होती. लीला पाटील (डॉ. उत्तमराव पाटील यांची पत्नी) यांना घातपाती कृत्याबद्दल साडेसात वर्षांची शिक्षा झाली होती. पण येरवडय़ाच्या तुरुंगातून त्यांनी पलायन केले. गर्भवतीचा वेश घेऊन त्या खऱ्या बाळंतिणीसोबत पत्री सरकारच्या हद्दीत पोहोचल्या. लीला पाटील या तुफान सेनेत कॅप्टनच्या हुद्दय़ावर होत्या. त्यांनी ग्रामीण महिलांना संघटित केले. या महिलांनी बंदुका चालविण्याचे शिक्षण घेतले. भूमिगतांना अन्न व स्फोटक साहित्य पोहोचविणे, प्रसंगी त्यांना आश्रय देऊन लपविणे, ही कामे त्या करीत. भूमिगतांना मदत केल्याबद्दल अनेकींना सहा महिन्यांपर्यंत शिक्षाही झाली. याच आरोपावरून सांगलीजवळच्या गावातील सीताबाई माळी व कोल्हापूरची काशीबाई हणबर आणि नागनाथ नायकवडींची आई यांचा पोलिसांनी अमानुष छळ केला. नाना पाटील यांच्या एका भाषणात ते म्हणाले होते की, 'आमच्या आया-बहिणींनी प्राणांची बाजी लावून आम्हाला लपविले, जो भाकरतुकडा दिला, ती आमच्या चळवळीला मोठी देन होय. त्यांचे हे ऋण फार मोठे आहे.' नानांचे हे विधान पत्री सरकारमधील स्त्रियांच्या कामाचे मोल कळायला पुरेसे आहे.

     १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण गोवा व मराठवाडा स्वतंत्र झाले नव्हते. हैदराबादच्या निजामाने दमनाचा कहर चालवला होता. हैदराबाद संस्थान स्वतंत्र करून भारतीय संघराज्यात सामील झाले पाहिजे, या मागणीसाठी जी चळवळ झाली, तोच हैदराबाद मुक्तीसंग्राम होय. मराठवाडा मुक्तीसंग्रामात ग्रामीण महिलांनी मोठे कार्य केले. मराठवाडा हा तसा मागासच भाग. तिथल्या समाजजीवनावर निजामी राज्यकर्त्यांची भाषा, राहणी व संस्कृतीचा थोडाफार परिणाम होताच. बायका तर घराचा उंबरठा ओलांडणेही कठीण. अशा परिस्थितीत तिथल्या स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्याकडून दारूगोळ्यांची ने-आण करणे, मुक्तीसंग्रामातील त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून देणे यासाठी श्री. रं. देशपांडे तथा एस. आर. गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या त्यांच्या कार्याबद्दल मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर त्यांना 'मराठवाडय़ाचे कर्वे' हा बहुमानाचा किताब मिळाला. मुक्तीसंग्रामात स्त्रियांच्या गटसभा घेणे, मिरवणुका काढणे, सत्याग्रहींची व्यवस्था करणे, बॉम्ब ठेवण्याच्या जागी टेहळणी करणे इत्यादी कामे त्यांनी केली. सेलूच्या गीताबाई चारठाणकर या सीमेवरून शस्त्रास्त्रे आणण्यात पटाईत होत्या. आशाताई वाघमारे याही भिंगरीसारख्या खेडय़ापाडय़ांत हिंडत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील कार्याबद्दल दगडाबाई देवराव पाटील धोपटेश्वरकर हिला 'वीर महिला' हा किताब मिळाला. ती होमगार्डच्या वेशात फिरे. ती जवळ जंबिया बाळगत असे. तिने खेडुत स्त्रियांचे संघटन केले. १५ ऑगस्ट १९४७ ला गावातल्या प्रत्येक घरावर तिने तिरंगा फडकवला होता. तिचे हे काम मराठवाडा स्वतंत्र होईतो सुरूच होते. त्यामुळे सरकारी अधिकारी हात धुऊन तिच्या मागे लागले. तिने सीमेवरच्या एका खेडय़ात स्थलांतर केले व तिथून तिने निजाम हद्दीत शिरून पोलीस चौक्या जाळणे, सरकारी जंगले जाळणे असे उद्योग करून निजाम सरकारला जेरीस आणले. लाडसवंगी येथे लोक व रझाकार यांच्यात लढाई जुंपली. रझाकारांनी  ६०-७० जणांना एका खोलीत अन्नपाण्याविना कोंडून ठेवले. दगडाबाईने गौळणीच्या वेशात रात्रीच्या वेळी लाडसवंगी ते औरंगाबाद हे २५ मैलांचे अंतर पायी चालून औरंगाबादच्या ठाण्यावर तक्रार नोंदविली. त्यानंतर सरकारी चक्रे फिरली व दोन-तीन तासांतच कैदी सुटले. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यात संसाराची अडचण होते म्हणून या स्त्रीने स्वत:च आपल्या नवऱ्याला दुसरा संसार थाटून दिला. या लढय़ात पुंजाबाई बुजरी, पोसनाबाई राजलिंग, गंगाबाई लक्ष्मण, बाळूबाई पानसरे, लक्ष्मीबाई मयेकर व गोदावरी रेळे या स्त्रिया हुतात्मा झाल्या.

     अशा प्रकारे स्वातंत्र्यलढय़ात महाराष्ट्राप्रमाणेच देशभरातील ग्रामीण स्त्रियांनी सक्रिय सहभाग घेतला होता. इतिहासतज्ज्ञ आर. सी. मुजुमदार यांनी स्वातंत्र्यलढय़ातील स्त्रियांच्या सहभागावर फारसा प्रकाशझोत टाकलेला नाही. परंतु कुणी कौतुक केले नाही तरी इतिहास हा इतिहासच राहणार आहे. आज ना उद्या या स्त्रियांच्या कार्यावरही अभ्यासक संशोधन करतील अशी आशा आहे. ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या ज्ञात-अज्ञात स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांना प्रणाम !

--रोहिणी गवाणकर,सौजन्य–लोकसत्ता
(सप्टेंबर 20, 2009)
---------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-लेख संग्रह.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.