मालती नंदन-स्वप्ना--लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:30:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मालती नंदन"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया,श्री अरुण वडुळेकर "मालती नंदन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्वप्ना"

                                स्वप्ना--लेख क्रमांक-5--
                               --------------------

" का रे? काय झालं? काही हवंय का?

"काकू, एक विचारू? ती स्वप्ना....."

" अगं बाई, तेही कळलं की काय तुला?" काकूंच्या चेहर्‍यावरचा तजेला मावळला आहे हे माझ्या लक्षात आलं.

" काय कळलं मला? काय आहे ते..... पण मला तर ती......." पण काकूंचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठे तरी तंद्रीत हरवल्या सारख्या त्या बोलत होत्या.

     फार गुणाची नि लाघवी होती रे ती पोर. खोचे मास्तरांची मुलगी ती. मास्तर बदली होऊन इथं आले तेव्हा जागेसाठी सरळ इथे आले. माणूस अगदी सज्जन आणि सरळ होता. वाड्याच्या मागे बारवेजवळ एक सहा खणाची जागा जरा जरा सुस्थितीत होती. नानांनी किरकोळ डागडुजी करून ती त्यांना वापरायला दिली. इतके दिवस मोकळ्याच पडलेल्या वास्तूत आता निदान सांजवात तरी लागेल म्हणून मलाही बरं वाटले. स्वप्ना मास्तरांची थोरली मुलगी. तशी आणखीही एक होती पण अजून ती परकरातही आलेली नव्हती. स्वप्नाला कुणी स्वप्ना म्हणत नसे. मास्तर आणि कावेरी वहिनी, तिची आई, तिला तायडी म्हणत. आणि मग सगळ्यांसाठी ती तायडीच झाली. तायडी नक्षत्रासारखी देखणी होती. मॅट्रिक झाली होती. तेव्हा मुलींना फार शिकवीत नसत. एखादं वर्ष जाऊ देत, छानसा नवरा पाहून तायडीचं लग्न करून देऊ, असं मास्तर म्हणत. तसा एक योग आलाही. पण तो काळयोग ठरला. तेव्हा गावांत वीज खूप लांबून यायची. घरातले दिवे तर अगदी मिण मिण पेटायचे. पुडे मग गावासाठी स्वतंत्र सब्‌स्टेशन तयार करण्याचं काम बोर्डानं काढलं. त्यासाठी काही माणसं जिल्ह्याच्या सर्कलमधून गावात आली. त्यात तो होता. माजगांवकर त्याचं नाव. नानांनी पुढच्या चौकालगतची एक खोली त्याला भाड्याने दिली. सडाफटिंग माणूस. आला तसा गेला. पण गेला तो इस्कोट करून गेला. इथे आला तसा त्याची न्‌ तायडीचे ओळख झाली आणि ती जवळिकीढे गेलेत कधी बदलली हे तिचे तिलाही समजले नाही. रोज तो कामावरून आला की एक तर त्याच्या खोलीत नाही तर बारवेच्या खाली पायर्‍यांवर तासन्‌ तास बोलत बसत. तसा त्याने तिला एक दोनदा बाहेर फिरायला नेण्याचाही प्रयत्न केला होता. पण तायडी मास्तरांच्या धाकाने तयार झाली नाही. तायडी त्याच्यात पुरती अडकली होती. अगदी बावरी राधा झाली होती. कावेरी वहिनींनादेखील एम मन वाटायचं, मुलगा चांगला धडधाकट आहे, शिकला सवरलेला आहे, नोकरीही चांगली, बोर्डाची, म्हणजे सरकारी आहे. तायडीला पटला असेल आणि मास्तर परवानगी देतील तर... काय हरकत आहे?....! पण ती वेळ आलीच नाही. एक दिवस तो अचानक नाहीसा झाला. आम्ही सगळेच चाट पडलो. तायडीचे अवस्था तर वणव्यात हरिण सापडावा तशी झाली होती. तिची रया मला बघवे ना. मी नानांना बोर्डाच्या हपीसात चौकशी करा म्हणाले. पण तिथे तर डोंगरच कोसळला अंगावर. खरा कहर तर पुढेच झाला. खोचे मास्तरांच्या साजुक घराला कुणा काळ्याची दृष्टच लागली जणू. रोज मास्तरांची आरडा ओरड आणि स्वप्नाच्या दबक्या आवाजातले किंचाळणे. आळीतही कुजबूज सुरू झाली. घडू नये ते घडले होते. तो मेला तायडीला मास्तरांनी गांव दोडण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही सामानाची बांधाबांध करून घराची चावे द्यायला इकडे आले तेव्हाच ते जाताहेत हे कळलं. बिचारे कुठे गेले पुन्हा त्यांचं काही कानी पडलं नाही.त्या हळव्या पोरीने हा आघात कसा झेलला असेल ते एक देवालाच ठाऊक. पुढे कधीतरी मास्तर गावात येऊन गेले असं उडत उडत समजलं. पण मास्तर इकडे काही आले नाहीत. खरं तर यायला हवं त्यांनी. जाऊ देत त्याचं काही वाटलं नाही. पण स्वप्नाही एकदोनदा वाड्याच्या मागे बारवेकडे दिसली होती म्हणे."

--अरुण वडुळेकर
(SUNDAY, DECEMBER 16, 2007)
------------------------------------

                (साभार आणि सौजन्य-मालती नंदन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.