द बाबा प्रॉफेट-नामर्द-(भाग-2)

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:44:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "द बाबा प्रॉफेट"
                                      ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "द बाबा प्रॉफेट" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "नामर्द-(भाग-१)"

                                       नामर्द-(भाग-2)--
                                      ---------------

"मी ट्रॅक बदलला नाहीये. तूच मला उगाच बोलतोयस."

"तू ट्रॅक बदलला नाहीस? नातेवाईकांवर पोचली नाहीस?"

"माफ कर रे बाबा मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत." ती त्रासून म्हणाली.

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तो मिश्किल हसत म्हणाला. "काहीतरी झोलझाल करून सुट्टी मिळवेन मी!"

अभय डोळे चोळत उठला. एकदम अंधार पडला होता.

'च्यायला दुपारी तासभरासाठी म्हणून झोपलो, तर आता संध्याकाळ होत आलीय.' तो आळस देत स्वतःशीच बोलत होता. "ह्या गावच्या मस्त हवेल झोपही मस्त लागते. पण हिनं उठवायचं नाही का मला!'

"स्मृती.." तिला हाक मारतच तो खोलीबाहेर आला. "स्मृती???"

"अरे ती आईसोबत कुठेतरी गेलीय बाहेर!" त्याची वहिनी म्हणाली.

"बरं बरं..पण इतक्या संध्याकाळी म्हणजे कमालच झाली!"

अभ्यास करत बसलेल्या पुतणीच्या टपलीत मारून तो बाहेर व्हरांड्यात जाऊन बसला.

"नाष्टा बनवून ठेवलाय रे. ये खायला, चहा टाकते मी. हे पण येतील एव्हढ्यातच." वहिनी म्हणाली.

"नको वहिनी, ही आली की मग जेवेनच सरळ."

"काय रे जोरू का गुलाम!"

एव्हढ्यात त्याला आई आणि स्मृती येताना दिसल्या. स्मृती एकदम थकून गेल्यासारखी वाटत होती.

"काय गं आई? कुठे घेऊन गेली होतीस हिला?" तो तिचा हात पकडत म्हणाला. तिचं अंग तापलं होतं.

"अरे कुठे नाही... देवळात" आई म्हणाली. पण त्या दोघींची झालेली नजरानजर त्याच्या नजरेतून सुटली नाही.

"तुला ताप भरलाय स्मृती!" चल आत आधी आणि तो तिला घेऊन आत गेला.

"परवा परत जायचंय आपल्याला आणि ताप कसला गं घेऊन आलीस?" तिच्या डोक्यावर तो पट्ट्या ठेवत होता.

"असंच रे..दमणूक झाली." ती त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाली. त्याला काहीतरी विचित्र वाटलं.

     दोन महिने उलटले होते अभय आणि स्मृतीला गावाहून येऊन. अभयचा इलाज चालू होता. पण कदाचित इन व्हिट्रो - आयसीएसआय करावं लागणार होतं. अजून महिन्याभरात काही ना काहीतरी मार्ग निघेलच असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. स्मृती खुष होती कारण अभयनं सगळंच खूप सहज स्वीकारलं होतं.

आणि एक दिवस स्मृती अभयला परत म्हणाली.

"अभय, आईंनी बोलावलंय रे!"

त्यानं तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. "गेल्या वेळेस काय केलं होतंस तिथे लक्षात आहे ना? इथे परत आल्यावरही आठवडाभर आजारी होतीस. अशक्तपणा जाईस्तो महिना उलटला. आणि आता पुन्हा?"

"अरे एकदा आजारी पडले म्हणजे काय नेहमीच पडणार आहे का? आणि ह्यापूर्वीही कित्येकदा गेलोय ना आपण गावाला?"

"बरं माफ कर. मला नाही तुझ्याशी भांडता येत."

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तिनं हसून टीव्ही चालू केला.

"स्मृती, तू नक्की आमच्याबरोबर येत नाहीयेस? असं शेवटच्या क्षणी काय गं!" अभयचा स्वर दुखावलेला होता.

"नाही रे. मला आईंबरोबर खूप सार्‍या गप्पा मारायच्यात. तू, भाऊजी, वहिनी आणि अबोली जाऊन या ना!"

"पण मग उद्या जाऊ ना आम्ही!"

"असं कसं रे, एव्हढी तयारी करताहेत वहिनी कालपासून."

"मग मी कशाला जाऊ, त्यांना जाऊ देत ना! तिकडे स्पेशली तुझ्यासाठी जायचं होतं. ते ठिकाण काय मी लहानपणापासून हजारदा पाहिलंय."

"असं कसं रे. त्यांना किती वाईट वाटेल. आपण जाऊ ना पुन्हा!"

"अगं पण उशीर होईल गं बये यायला!"

"अरे आहेत ना आई माझ्यासोबत!"

     तो चेहरा पाडून गेला, तेव्हा स्मृतीलाच खूप वाईट वाटलं. त्याच्याशी ती कधीच खोटं बोलली नव्हती. तिला खूप अपराधी वाटत होतं.

     अभय रिक्षातून उतरला आणि पायवाटेवरून झपझप घराकडे निघाला. घराचा दरवाजा उघडा बघून त्याला शंका आली. आणि एकदम घरातून धूराचा वास येत होता. अचानक घरातून कुणीतरी मंत्रोच्चारण करत असल्याचा आवाज येऊ लागला. तो पटकन आवाजाच्या दिशेनं निघाला. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. तो आत शिरला आणि आतलं दृश्य पाहून हादरलाच.

--द प्रॉफेट
(16/12/2010)
---------------

                (साभार आणि सौजन्य-द बाबा प्रॉफेट.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               ------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.