शंभर टक्के-हंड्रेड परसेंट-नातू अँड बाळ-बाळ--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:26:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "शंभर टक्के-हंड्रेड परसेंट"
                                -------------------------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री कोहम यांच्या "शंभर टक्के-हंड्रेड परसेंट" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "नातू अँड बाळ-बाळ"

                           नातू अँड बाळ-बाळ--क्रमांक-2--
                          ----------------------------

     मला बाळ वाटलेला माणूस चपराशी निघाला. त्याचे कपडे माझ्यापेक्षाही चांगले होते. पण पहिल्याच बॉल ला क्लीन बोल्ड झाल्यासारखं मला वाटलं. सीमा आणि रश्मी एकमेकींशी बोलत होत्या. मी त्यांच्यापासून दूर सभ्य मुलासारखा बसून इकॉनॉमिक टाइम्स वाचत होतो. शेवटी आनंद बाळांनी आम्हाला बोलावलं. ते स्वतः केबिनमधून बाहेर आले आणि मुलींकडे बघून त्यांना

"ओह सॉरी तुम्हाला जरा थांबायला लागलं. या. या. "

     तिथे मीही आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. अर्थात कुणाच्या लक्षात येण्यासारखं माझं व्यक्तिमत्त्व नाहीच आहे. तिथली टेबलं खुर्च्या, झाडाच्या कुंड्या, चपलांचा स्टँड ह्यांच्यासारखाच मी एक. असा बहुदा बाळांचा समज झाला असावा. आम्ही तिघं असल्याचं रश्मीने त्यांना सांगितलं. मग त्यांनी मलाही आत घेतलं. माझ्याकडे बघून त्यांना फारसा आनंद झाला असं वाटलं नाही. पांढरे आइसक्रीमवाल्या पांढऱ्यांसारखं, आनंद बाळांचं नावही त्यांना शोभत नाही असं मल वाटून गेलं.

     मग बराच वेळ बाळ स्वतःची लाल करीत बसले. आम्ही असे आणि आम्ही तसे. तुम्हाला कसं इथे भरपूर शिकायला मिळेल. आम्ही कसे चांगलेच आहोत वगैरे. मी यांत्रिकपणे मान डोलवत होतो. संधी मिळाली की रश्मीकडे पाहत होतो. सीमा आणि रश्मी एकदम लक्ष देऊन ऐकत होत्या आणि बाळांचं लक्षही त्यांच्याकडेच होतं, त्यामुळे मी ऐकत नसल्याचं त्यांच्या गावीही नव्हतं. शेवटी एकदाचं बाळ पुराण संपलं. सीमा आणि रश्मी दोघींनीही बाळांना प्रश्न विचारले. त्यांनी त्यांची उत्तर दिली.

     इंटरव्ह्यू म्हणता म्हणता एकही प्रश्न न विचारताच बाळांनी भेट संपवली. दोघी पोरी खूश होत्या. जाता जाता बाळ म्हणाले मग फोन करून सांगा कधी पासून जॉईन होणार ते. मी हो म्हटलं.

     एका बाजूला खूप बरं वाटलं. आर्टिकलशिपची चिंता मिटली. ते एक काम झालं. तीन वर्ष रश्मी सोबत असणार ह्याचा आनंद सर्वाधिक झाला. पण दुसऱ्या बाजूला थोडं वाईटही वाटलं. खरंतर आम्हा तिघांत मला सर्वात जास्त मार्क मिळाले होते. मला रँक मिळाला होता. त्या दोघींना नाही. पण बाळ एका शब्दाने म्हणाले देखिल नाहीत की तुला चांगले मार्क मिळाले वगैरे. अख्खा वेळ त्या दोघींशी बोलण्यात घालवला. जसा मी तिथे नव्हतोच. त्या दोघींसमोर माझा असा अनुल्लेख मला खूप लागला. त्या दोघींना घेतलं आणि मी बरोबर होतो म्हणून मला पण घेतलं का? की मी त्या लायकीचा आहे म्हणून मला घेतलं. एकदा वाटलं होतं सरळ उठून निघून जावं. आर्टिकलशिपची काय कमी नाही. इथे नाही तर तिथे होईल. पण दुसरीकडे रश्मी नसती ना.

     घरी पोचलो. आईनं विचारलं कसं काय झालं वगैरे. काहीही कारण नसताना मी तिलाच तिरकी उत्तरं देत राहिलो. कपडे बदलण्याकरता माझ्या खोलीत गेलो. समोरंच आमचं जुनं कपाट ठेवलेलं होतं. कपाटावर धुरकट झालेला आरसा होता. माझी जुनी जीन्स, अजागळ शर्ट. डोक्याचे आणि दाढीचे वाढलेले केस. मला रश्मी कशी मिळणार होती? कोण माझ्याकडे का लक्ष देणार होतं.

     बराच वेळ स्वतःला बघत राहिलो. पांड्या म्हणून मिल्या जिन्यातूनच ओरडला तेव्हाच भानावर आलो.

(क्रमशः)

--कोहम.
(Tuesday, July 28, 2009)
----------------------------

                   (साभार आणि सौजन्य-शंभर टक्के.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.