विलास लक्ष्मणराव कोंडविलकर-सोपा आणि रामबाण उपाय

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:47:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "विलास लक्ष्मणराव कोंडविलकर"
                             -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विलास लक्ष्मणराव कोंडविलकर यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सोपा आणि रामबाण उपाय"

                               सोपा आणि रामबाण उपाय--
                              ------------------------

     कालचक्र सतत फिरत असतो असे म्हणतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि  पुन्हा सकाळ, दुपार असे चक्र सतत फिरत राहते. हे कधीच थांबले नाही. अगदी कोणतीही भयानक गोष्ट घडली तरीही किंवा एखाद्या प्रमुख व्यक्तीचे देहावसान झाले तरीही ! जगात कोठेही काहीही घडत असले तरी कालचक्र सतत फिरतच राहतो.
दिवस, रात्री प्रमाणेच कालचक्राच्या रहाटगाडग्यात ऋतूनाही फिरावे लागते. हिवाळा ! उन्हाळा ! पावसाला ! पुन्हा हिवाळा !

     उन्हाळ्याच्या प्रखर दाहानंतर पावसाच्या येणाऱ्या सरी किती सुखद असतात याची कल्पना कवी मन असल्याशिवाय कळायची नाही. पावसाळ्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगाची कवींनी केलेली वर्णने मन उल्हसित करीत असतात.

     लहान मुलांची  " येरे येरे पावसा " ही साद घरातील थोरामोठ्यानांही मोहवित असते. साचलेल्या पाण्यात कागदी होड्या तरंगत ठेवण्याची त्यांची निरागस धडपड पाहून वयोवृद्धही आपल्या बाल्यावस्थेतील जीवनात पोचलेले असतात. पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार झाडे झुडपे किंवा आकाशातील इंद्रधनुष्य निसर्गाची शोभा द्विगुणीत करीत असतात. कालचक्रामध्ये वर्षभरात या गोष्टी एकापाठोपाठ येत असतात आणि जात असतात.

     कालचक्र नेहमीच्या गतीने फिरत असला तरी आता मात्र येणाऱ्या ऋतूंमध्ये फरक पडलेला जाणवतो. नोव्हेंबर, डिसेंबरमधील कडाक्याच्या थंडीच्या वेळेला अंगामधून घामाच्या धारा येतील एवढे गरम होत असते. तर पाऊस अचानक अदृश्य होत असल्यामुळे श्रावणमासी हर्ष मानसी या अवस्थेत बदल होवून श्रावणातसुद्धा उदास वाटत असते. दरवर्षी कुठेतरी दुष्काळ पडत असतोच ! मुंबईतसुद्धा पाणी टंचाई असते. अशा वातावरणात माणसाला वाटणाऱ्या उदासपणामुळे किंवा दुष्काळ, टंचाईमुळे तो पावसाला दोष देत राहतो. पण माणूस आपला दोष मात्र विसरतो.

     कालचक्र आजपर्यंत नेहमीच्या गतीने फिरत आहे, मग निसर्गात बदल का झाला याचा माणूस विचार करीत नाही. वाढणारे प्रदूषण, ढासळणारे पर्यावरण, भुईसपाट होणारे डोंगर आणि झाडे ! बुजली जाणारी तलाव आणि खाडी ! वायू आणि जल प्रदूषित करणारी रसायने ! या सर्व गोष्टीमुळे माणसाने निसर्गावर किती अन्याय केला आहे हे आपल्या लक्षात येईल आणि आपण केलेले आपल्यावरच उलटते या चक्राप्रमाणे आता माणसाचेच आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.

     यावर उपाय शोधण्यासाठी आता संशोधन चालले आहे. चर्चासत्रे, बैठका होत आहेत. पण यावर सोपा आणि रामबाण उपाय एकच ' झाडे लावा, झाडे जगवा ' हा मंत्र आणि त्याप्रमाणे अंमलात येणारे तंत्र !

--विलास लक्ष्मणराव कोंडविलकर
(SUNDAY, 31 JULY 2011)
-----------------------------

               (साभार आणि सौजन्य-विलास कोंडविलकर.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              -----------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.