मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-25-बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड-8

Started by Atul Kaviraje, December 02, 2022, 09:18:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-25
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड"

                   बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड--क्रमांक-8--
                  --------------------------------------------------

     दहा तासात आपण कोठून कोठेपर्यंत कसे गेलो याचा अंदाज घेतला. येथून किल्ला जास्तच रौद्र आणि अजस्त्र वाटत होता.

     सुरवातीची पांढरी रेघ जेथे काटकोनात वळली तेथे सोमेश्वर मंदिर होते.

     येथून उतरून परत सोमेश्वर मंदिरात गेलो. तेथील पुजारीकाकाना योग्य मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद देऊन पुढे देवीच्या मंदिराकडे निघालो. तेथून अजून एक अज्ञात रस्ता पकडून अंदाजे निघालो तर डायरेक्ट गणेश मंदिरात पोहोचलो.

     मुल्हेर माचीवरून उतरून परत सर्व प्रवेशद्वारांना निरोप देऊन पायथ्याशी आलो.

     आता बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती. सकाळी आमच्याबरोबर शेतापर्यंत आलेली मंडळी घरी जायच्या लगबगीत होती. तर काही येथे राहणारी मंडळी गावातून काम करून परत घरी निघाली होती. कामावरून घरी जाताना कडेवर मुले बाळे, हातात डबा, रोजंदारीची हत्यारे आणि चेहऱ्यावर सुखी हास्य. मला माझे हापिस सुटल्यानंतरचे माझे अविर्भाव आठवले. खरेच निसर्गाच्या कुशीत राहून ही माणसे किती सुखी होती.

     काही गोळ्या, चॉकलेटे शिल्लक होती, ती रस्त्यात खेळणाऱ्या मुलांना दिली तर बराच डबा उरला होता, तो वाया जायला नको म्हणून तेथील गरिबांना दिला.

     भव्य, दिव्य, अभेद्य, अशक्य, तुफान, फाडू अश्या सगळ्या विशेषणांचा अनुभव आम्हाला या एकाच ट्रेक मध्ये आला होता. तरीही मुल्हेर-मोरा बरोबर अजून एक दिवस असता तर हरगडही झाला असता असे राहून राहून वाटत होते. हरगडावर काही टन वजनाच्या ३ तोफा आहेत असे ऐकले होते. त्या बघायचा आज काही योग नव्हता. एका वेळी वाटले की मांगी-तुंगी रद्द करून उद्या हरगडालाच जाऊया, पण प्लान आधीच ठरला होता तसेच आता अंगातही त्राण उरले नव्हते.

     आता आम्ही परत गावात शिरलो आणि थेट बाजारातच गेलो उद्याच्या मांगी-तुंगी ट्रेकची तयारी करण्यासाठी. उद्याची मांगी-तुंगीला जायची सोय बघून जर गावात टंगळ- मंगळ करीत निवांत वेळ काढला. आज संध्याकाळी परत समाधीला न जाता गावातील ओळखीच्या माणसाकडे त्याच्या आग्रहास्तव जेवायला गेलो. "गोड काजू शिरा" अजूनही जिभेवर रेंगाळतोय.

     आयुष्यात एकदा तरी ह्या किल्ल्यावर जाऊन यावे असे माझे मत आहे.याआधी जर मला कोणी "तुझा सर्वोत्तम ट्रेक कुठला?" असे विचारले असते तर 'हरिश्चंद्रगड' हेच उत्तर दिले असते. आता मात्र माझे मत बदलले होते.

     निसर्गापुढे आपण किती खुजे आहोत हे जाणवतानाच आपले पूर्वज माणसे कोणत्याही प्रकारचे तंत्र अस्तित्वात नसतानाहि कित्येक मैल आपल्या पुढे होती असे जाणवत राहते.

     आताशा, तब्बल ३० पेक्षा जास्त तासांची चढाई झाली होती. फोटोंची संख्या दोघांच्या मिळून २ हजारांवर गेली होती. किल्ल्यावरील कोरलेल्या इतिहासाच्या त्या खुणा माझ्याही मनावर आठवणींचे शिल्प कोरून गेल्या असाव्यात. आजपर्यंतच्या प्रवासात काहीतरी वेगळे उमगले होते. गेल्या तीन दिवसात जे जे काही पहिले होते, अनुभवले होते त्याने मन तृप्त झाले होते. आता शरीरही थकल्यासारखे वाटत होते . पाय दुखून दुखून वेदनालेस झाले होते. आता कितीही चालले तरी पाय दुखणार नाहीत. त्यांच्यातला सेन्सच गेला होता बहुतेक. :) . घरचीही ओढ लागली होती.

     पण, अजून मांगी-तुंगी बाकी होते, हत्ती गेला होता आता फक्त शेपूट राहिले होते.
( ते शेपूट नव्हतेच, तो अजून एक हत्तीच होता. त्याबद्दल पुढच्या भागात -
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी-तुंगी आणि परतीचा प्रवास )

--सागर
-------
(May 9, 2013)
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.12.2022-शुक्रवार.