मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-53-सुरकोटला अश्व-भाग - 3-

Started by Atul Kaviraje, December 30, 2022, 09:29:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-53
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व-भाग 3"

                                सुरकोटला अश्व-भाग 3--
                               ---------------------

             (मागील भागावरून पुढे)--

     भारतीय उपखंडावर, इतिहासपूर्व कालामध्ये झालेल्या आर्यांच्या तथाकथित आक्रमणाचा सिद्धांत अशा रितीने मोडीत निघाल्याने, 2 सहस्त्रके अस्तित्वात असलेली सिंधू-सरस्वती संस्कृती यानंतर अचानक विलयास कशी गेली? या कोड्याचे उत्तर आता आतापर्यंत पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकार यांना मिळत नव्हते. Woods Hole Oceanographic Institution (WHOI) या संस्थेच्या विद्यमाने व लिव्हिउ जिओसान (Liviu Giosan) या भूगर्भशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे कालावधीसाठी चाललेला एक विस्तृत अभ्यास या आंतर्राष्ट्रीय अभ्यासगटाने नुकताच पूर्ण केला. या अभ्यासाच्या अहवालात, या कोड्याचे उत्तर आता मिळाले असल्याचा दावा केला गेलेला आहे. या अभ्यासगटाची निरीक्षणे व निष्कर्ष याबद्दल माहिती एका निराळ्या लेखात मी दिली आहे व रुची असणारे वाचक हा लेख बघू शकतील. परंतु आपल्या सध्याच्या विषयाची सुसूत्रता रहावी म्हणून या अहवालातील काही मुख्य निरीक्षणे मी येथे परत देत आहे.

     सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यात ही विशाल मानव संस्कृती स्थिर होण्याच्या सुमारे 10000 आधीच्या वर्षांत, बेफाम व अफाट रितीने वाहणारी सिंधू व तिच्या उपनद्या, यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात, सुपीक मातीचा गाळ, नदीकाठ व या नद्यांमधल्या प्रदेशात आणून भरला होता. लिव्हिउ जिओसान यांच्या पथकाला या सपाट प्रदेशात 10-20 मीटर उंच, 100 किमी रूंद आणि सिंधू नदीच्या प्रवाहाला समांतर अशा रितीने 1000 किमी लांबवर पसरलेल्या एका महा-टेकडीचा शोध लागला. या टेकडीला सिंधू महा-टेकडी (Indus mega-ridge) असे नाव या पथकाने दिले. हे नाव देण्याचे कारण म्हणजे ही टेकडी, सिंधू नदीने वरून वाहत आणलेला सुपीक गाळ खालच्या संपूर्ण नदीकाठच्या प्रदेशात आणून पसरवून निर्माण केली होती. आतापर्यंत सिंधू खोर्‍यात सापडलेल्या सर्व हडप्पा कालीन वसाहती या महा-टेकडीच्या खाली गाडल्या गेलेल्या नसून ही टेकडी प्रत्यक्षात या उत्खनन केलेल्या वसाहतींच्या खाली सापडते आहे. यावरून असे म्हणता येते की सिंधू खोर्‍यातील मानव संस्कृती ही या गाळाच्या महा-टेकडीच्या खाली नसून पृष्ठभागावर वसली होती.

     सिंधू- सरस्वती खोर्‍यातील नद्यांना महापूर आणणारा मॉन्सूनचा पाऊस याच काळात हळू हळू कमी होऊ लागला. हा कमी होणारा पाऊस आणि त्यामुळे हिमालय आणि इतर पर्वतांच्या उतारावरून वाहत येणार्‍या पाण्याचे कमी प्रमाण यामुळे या नद्यांच्या काठांवर शेती करणे शक्य झाले. शेतीच्या या शक्यतेमुळे या भागात मानवी वसाहती हळू हळू वाढू लागल्या. कमी होत राहिलेल्या पावसाच्या प्रमाणाने सुमारे 2 सहस्त्र वर्षांचे एक काल-गवाक्ष (window of opportunity) हडप्पा संस्कृतीवासियांना एखाद्या सुवर्ण संधीसारखे उपलब्ध झाले.( a window of about 2000 years in which Harappans took advantage of the opportunity) व त्याचा भरपूर फायदा या संस्कृतीने घेतला व ही विशाल संस्कृती सिंधू-सरस्वती आणि त्यांच्या उपनद्या या नदी खोर्‍यांच्यात विकसित झाली. ही संस्कृती भरपूर पाणी व उत्तम हवामान यांच्यामुळे दरवर्षी हातात येणार्‍या अमाप अन्नधान्याच्या उत्पन्नावर अवलंबून होती. शेती व नंतर धान्याचा व्यापार यासाठी खूप मोठ्या संख्येने श्रमिकांची आवश्यकता असल्याने जेथे असे श्रमिक मोठ्या संख्येने एकाच स्थानी उपलब्ध होऊ शकतील अशी मोहेंजो-दाडो किंवा हडप्पा सारखी महानगरे या संस्कृतीमध्ये विकसित झाली.

     पुढे हा मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण आणखी आणखी कमी होऊ लागले व 2000 वर्षाचे हे काल-गवाक्ष हळूहळू बंद होण्याच्या मार्गाला लागले. पूर्वी जेथे उदंड पाणी उपलब्ध होते तेथे आता फक्त मरूभूमी दिसू लागल्या. पावसाच्या कमी प्रमाणाने पूर्वी अमाप येणारी पिके आता रोडावू लागली व महानगरातील श्रमिकांना कामधंदा मिळणे दुरापास्त होऊ लागले. या सर्व कारणांमुळे उत्तरेकडे विकसित झालेल्या सिंधू खोर्‍यातील रहिवासी इ.स.पूर्व 1500 च्या आसपास, जेथे मॉन्सूनचा पाऊस अजूनही स्थिर प्रमाणात पडत होता अशा गंगा खोर्‍याकडे सरकू लागले. या भागातील मॉन्सूनचा पाऊस जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी पावसावर अवलंबून असलेली शेती व नद्यानाल्यातील उपलब्ध पाणी हे फक्त छोट्या स्वरूपातील शेतीसाठीच उपयुक्त होते. या कारणामुळे सिंधू खोर्‍यातील मोठ्या शहरांसारखी शहरे गंगा खोर्‍यात निर्माण न होता, मर्यादित स्वरूपाच्या शेतीच्या आधारावर टिकू शकतील अशा लहान नगर राज्यांची अर्थव्यवस्था (City States) येथे स्थापली गेली. मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या. आणि स्थलांतरित जनसंख्या लहान लहान गावात विखुरली गेली.

--क्रमशः--

--चंद्रशेखर
----------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.12.2022-शुक्रवार.