मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-56-सुरकोटला अश्व-भाग - 3-

Started by Atul Kaviraje, January 02, 2023, 09:48:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-56
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व-भाग 3"

                                सुरकोटला अश्व-भाग 3--
                               ---------------------

     सिंधू संस्कृतीमधील दक्षिणेकडच्या वसाहतीतील मानव, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र याकडे सरकू लागले असा उल्लेख मी वर केला आहे. परंतु याला काही पुरावा आहे का असा प्रश्न साहजिकपणे समोर येतो. मात्र मात्र असा पुरावा पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या श्री. सांकलिया, श्री ढवळीकर वगैरे शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील, प्रवरा आणि घोड नद्यांच्या खोर्‍यात केलेल्या उत्खननात निर्विवाद्पणे आढळून आला आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या परिभाषेत इ.स.पूर्व 1700 ते 1400 या कालखंडातील ब्रॉन्झ युगातील संस्कृतीला मालवा संस्कृती असे म्हटले जाते. ही मालवा संस्कृती आणि धोलाविरा किंवा सुरकोटला येथील संस्कृती, यात कमालीची साम्यस्थळे आढळून येतात. प्रवरा खोर्‍याच्या दक्षिणेकडे घोड नदीच्या काठावर असलेल्या इनामगाव येथील उत्खननात इ.स.पूर्व 1700 ते 800 या प्रदीर्घ कालखंडातील मानवी वसाहती सापडल्या आहेत. या कालखंडात येथे स्वत:ची खास वैशिष्ट्ये असणार्‍या तीन (मालवा, पूर्वकालीन जोरवे-1 आणि जोरवे-2) मानवी संस्कृती होऊन गेल्या असे हे शास्त्रज्ञ सांगतात. या निष्कर्षांमुळे सिंधू संस्कृतीचा अस्त झाला या म्हणण्यात फारसे हंशील नसून ही संस्कृती भारतात इतरत्र पसरत गेली असेच मान्य करावे लागते. इनामगाव उत्खननातील एक महत्त्वाची बाब म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृतीतील फलधारकत्व किंवा मातृत्व यांची प्रतिमा म्हणून स्त्री मूर्तीचे केले जाणारे पूजन तसेच पुढे चालू राहिलेले दिसते. या शास्त्रज्ञांच्या मताने ही स्त्री मूर्ती बहुदा या कालात जगन्माता म्हणून पूजली जाऊ लागली असावी. याशिवाय दाइमाबाद येथे सापडलेला ब्रॉन्झ रथ व इतर प्राणी अप्रतिम आहेत.

     यानंतर शेवटी आपण इ.स.पूर्व दुसर्‍या सहस्त्रकात वैदिक धर्माच्या भारतात झालेल्या प्रसाराकडे वळूया. वैदिक धर्म कोठे उदयास आला याबाबत तज्ञात बरेच मतभेद आहेत. यापैकी प्रसिद्ध इतिहास तज्ञ श्रीमती रोमिला थापर व इतर काही तज्ञांच्या मते हा धर्म उत्तर अफगाणिस्तान मधील मार्जिनिया / बॅक्ट्रिया या भागात प्रथम उदयास आला तर वर मी उल्लेख केलेले बी.बी.लाल व इतर यांच्या मताने हा धर्म भारतामध्येच सरस्वती नदीच्या खोर्‍यातच उदयास आला. हा धर्म कोठेही उदयास आलेला असला तरी हडप्पा संस्कृतीतील लिंग व फलधारकत्व किंवा मातृत्व पूजन, प्रतिमांच्या माध्यमातून करण्याची परंपरा खंडित करून ती जागा या वैदिक धर्माने इ.स.पूर्व दुसर्‍या सहस्त्रकात कशी घेतली हे आपल्यासमोरचे मूळ कोडे आहे.

--क्रमशः--

--चंद्रशेखर
----------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.01.2023-सोमवार.