मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-57-सुरकोटला अश्व-भाग-3-

Started by Atul Kaviraje, January 03, 2023, 09:55:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-57
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सुरकोटला अश्व-भाग 3"

                                 सुरकोटला अश्व-भाग 3--
                                ---------------------

     या कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी इ.स.पूर्व पहिल्या सहस्त्रकाच्या अखेरीस, चीन, कोरिया, जपान, थायलंड आणि कंबोडिया या सारख्या भारतापासून अतिशय दूर असलेल्या एशिया खंडातील अनेक राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार कसा झाला याचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते. इ.स.पूर्व 300 नंतर, सम्राट अशोकाने या ठिकाणी पाठवलेल्या बौद्ध भिख्खूंच्या माध्यमातून, या देशांनी हा धर्म स्वीकारला होता. या भिख्खूंनी कोणावरही सक्ती किंवा कसलीही लालूच न दाखवता धर्मप्रसाराचे हे कार्य पार पाडले होते. माझ्या मताने याच पद्धतीने भारतीय उपखंडात ही संपूर्ण नवीन विचारधारा असलेला वैदिक धर्म, प्रथम त्या काळात सगळीकडे पसरलेल्या छोट्या छोट्या नगरराज्यांच्या राजांनी स्वीकारला असावा व यथा राजा तथा प्रजा या न्यायाने त्याचा प्रसार झाला असावा.

     परंतु हा नवीन धर्म स्वीकारल्यावरही सिंधू संस्कृतीतील लिंग पूजा व फलधारकत्व पूजन या दोन्ही गोष्टी समाजात चालूच राहिल्या. वैदिक धर्मातील रुद्र या पंचमहाभूतांशी संबंधित नसलेल्या देवाबरोबर लिंगपूजन जोडले गेले तर फललधारकत्व किंवा मातृत्व पूजन हे जगन्माता किंवा दुर्गा पूजन या नावाने ओळखले जाऊ लागले. वर उल्लेख केलेल्या इनामगाव उत्खननात सापडलेल्या जगन्मातेच्या प्रतिमा या तर्काला पुष्टी देतात असे मला वाटते.

     2011/ 12 या वर्षी भारतातील कौन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेने भारतीय उपखंडामध्ये झालेले आधुनिक मानवांचे स्थलांतर या विषयामध्ये केलेल्या जनुकांच्या अभ्यासावर आधारित असलेल्या एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाप्रमाणे भारतात झालेली स्थलांतरे मध्य एशिया, मलेशिया आणि अंदमान बेटे या 3 स्थानांवरून झालेली असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे अशी पूर्ण शक्यता वाटते की सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील मानव हे मुळात मध्य एशिया मधून येथे आले असावेत. सिंधू-सरस्वती खोर्‍यांत ते 2 ते 3 सहस्त्रके राहिले असावेत व नंतर तेथे राहणे कठीण बनल्यावर पूर्वेकडे व दक्षिणेकडे त्यांनी प्रयाण केले असावे. इनामगाव उत्खननामुळे या तर्काला चांगलीच पुष्टी मिळते असे मला तरी वाटते.

     थोडक्यात सांगायचे तर सिंधू-सरस्वती संस्कृतीवर कधीच आर्यांचे आक्रमण झाले नाही आणि ती कधीच लयास गेली नाही. भारतीय संस्कृती या नात्याने ती अजूनही जोमाने टिकून आहे नव्हे तर वृद्धिंगतही होते आहे.

--(समाप्त)
----------
--चंद्रशेखर
----------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.01.2023-मंगळवार.