मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-122

Started by Atul Kaviraje, February 12, 2023, 10:43:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-122
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "शेतकरी"

     भारताला कृषी प्रधान देश म्हटले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच आहे. शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हटले जाते. शेतकरी हा संपूर्ण दिवस शेतात काम करतो. ऊन, वारा, पाऊस इत्यादींची पर्वा न करता आपले कार्य करीत असतो. शेतकरी कठीण परिश्रमाचे प्रतीक आहे. त्याच्यात फार संयम असतो. वर्षभर शेतात काम करून तो आपल्या कष्टाच्या फळाची वाट पाहत बसतो.

     शेतकरी आपले जीवन सन्मानाने जगतो. आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवतो. शेतकऱ्याचे जीवन संतुलित असते. तो दररोज सकाळी लवकर उठतो. दिवसभरात त्याला अनेक कामे करायची असतात. सकाळी लवकर उठून तयारी वैगरे करून तो शेताकडे निघतो. तो आपला संपूर्ण दिवस शेतातील पिकांची काळजी मध्ये घालवतो. शेत नांगरणे, पीक पेरणे, पिकाला पाणी देणे, ऊन वाऱ्यापासून आपल्या पिकाचे रक्षण करणे इत्यादी अनेक कामे शेतकऱ्याला करावी लागतात.

     शेतकरी त्याचे पीक अनेक नैसर्गिक आपत्या पासून संरक्षित करतो. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादींपासून तो आपल्या पिकाचे रक्षण करतो. शेतात सुंदर बहरलेल्या पिकामागे शेतकऱ्याची शेताविषयीची भक्ती, प्रेम आणि कठीण परिश्रम असते. एक शेतकरी संपूर्ण जगातील मानवाला अन्न पुरविण्यासाठी आपल्या जीवन व्यतीत करतो. दिवसभर शेतात काम केल्यावर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर शेतकरी आपल्या घरी पोहोचतो. ज्यावेळी तो घरी पोचतो तेव्हा तो अत्यंत थकलेला असतो पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. हा आनंदच त्याच्या कष्टाचे फळ असते.

     कोणत्याही देशाच्या यशासाठी शेतकऱ्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. शेतकरी आपल्या प्रयत्नांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो. आणि म्हणूनच शेती व शेतकऱ्याला अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील शासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्याची योग्य सोय करायला हवी, जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले कार्य करू शकतील.

     शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहित करायला हवे. आधुनिक पद्धतीने केलेली शेती त्यांना कमी कष्टात जास्तीचे उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेतकऱ्याचे जीवन आपल्याला अनेक शिकवण देऊन जाते. त्यांचे कठीण परिश्रम आणि संयम आपण सर्वांसाठी एक एक उदाहरण आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना शक्य होईल तशी मदत करायला हवी. जर काही कारणास्तव शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले असेल तर त्याला आर्थिक सहाह्य करायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2023-रविवार.
=========================================