मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-106-गप्पा गणितज्ञाशी! (भाग: 2/5)

Started by Atul Kaviraje, February 21, 2023, 09:40:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-106
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी! (भाग: 2/5)"

                              गप्पा गणितज्ञाशी! (भाग: 2/5) --
                             ----------------------------

     डॉ. भास्कर आचार्य कॉफी शॉपच्या कोपऱ्यातील एका टेबलापाशी बसले होते. मला बघितल्यावर बसण्याचा इशारा करून माझ्याकडे त्यानी हळूच एक चिठ्ठी सरकवली.

हे काय?
तुमच्या विद्यार्थ्यांसाठी. तुमच्या विनोदी चुटकुल्यांच्या मोबदल्यात.....

मी चिठ्ठी वाचली. चिठ्ठीत दोन प्रश्न होते:

प्रश्न 1: एका पिशवीत 3 निळ्या रंगाच्या, 5 काळ्या रंगाच्या व 1 पांढऱ्या रंगाची अशा पायमोज्यांच्या जोड्या कोंबल्या आहेत. पिशवीच्या आत डोकावून न पाहता किमान किती पायमोज्या बाहेर काढल्यास एकाच रंगाची एक तरी जोडी मिळू शकेल?

प्रश्न 2 : अ, ब व क यांनी एका ओल्या पार्टीचा बेत आखला. प्रत्येकाने जमेल तेवढे बीअरच्या बाटल्या विकत आणायचे व बाटल्या फस्त झाल्यानंतर हिशोब करण्याचे ठरले. अ नी 5 बाटल्या व ब नी 3 बाटल्या आणल्या. परंतु क ला दुकानापाशी पोचण्यास उशीर झाल्यामुळे तो काहीही आणू शकला नाही. पार्टीची नशा ओसरल्यानंतर क कडून 240 रूपये वसूल करून अ व ब नी पैशाची वाटणी करून घेतली. बाटलीची किंमत समान असल्यास वाटणी कशाप्रकारे झाली असेल?

एकदम सोपे गणित आहेत. विद्यार्थी सहज सोडवतील.

तुमच्या येथील शिक्षण पद्धतीवर तुमचा भलताच विश्वास दिसतो.

त्यात काय चुकीचे आहे?

मला नाही वाटत की तुमच्या शिक्षण पद्धतीमुळे मुलं सज्ञानी होतील व तुमचा उद्देश सफल होईल.

थोडेसे स्पष्ट कराल का?

     माझ्या प्रश्नाला थेट उत्तर न देता या विषयाशी संबंधित 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिन या दिवशी रेकॉर्ड केलेल्या एका शिक्षकाची लाइव्ह मुलाखतच त्यानी लॅपटॉप उघडून दाखवायला सुरुवात केली.

तुम्हाला शिक्षक व्हावे असे का वाटले?

     लहान वयातील मुलांना सज्ञानी बनवावे, त्यांच्यातील उत्सुकतेला उत्तेजन द्यावे, हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. अगदी लहान वयापासूनच त्यांची बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी, त्यांना चारित्र्यवान बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व त्यासाठी शिक्षकी पेशाला दुसरा पर्याय नाही.

या शिक्षकी व्यवसायात आपण समाधानी आहात का?

     जितके व्हायला हवे होते तितके समाधान मिळाले नाही. आपली सार्वजनिक शिक्षण व्यवस्था - व्यवस्था की अव्यवस्था, काहीही म्हणा - रशियातील कम्युनिस्ट राजवटीसारखी आहे असे मला वाटते. नोकरशाहीचा विळखा. वरून येणाऱ्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याची सक्ती. त्यात काही बदल वा सुधारणा करण्यास वाव नाही. नाविन्यतेला वाव नाही. या वयातच गुणवत्ता, कार्यक्षमता, क्रियाशीलता इत्यादींचे महत्व पटवून दिल्यास उद्याचे नागरिक म्हणून ते देशाची धुरा संभाळू शकतील. परंतु येथेच भोंगळ व्यवस्था असल्यामुळे पालक व इतरांकडून आम्हा शिक्षकांना नको नको त्या गोष्टी ऐकून घ्यावे लागतात. एक पालक म्हणूनही मी समाधानी नाही. सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडत असलेली पिढी खाजगी व्यवस्थेतील पिढीपेक्षा फारच गुणवत्ताविहीन व निकृष्ट दर्जाची आहे. जॉब मार्केटमध्ये ती तग धरू शकणार नाही.

--प्रभाकर नानावटी
(January 31, 2013)
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.02.2023-मंगळवार.
=========================================