मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-107-गप्पा गणितज्ञाशी! (भाग: 2/5)

Started by Atul Kaviraje, February 22, 2023, 09:36:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-107
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी! (भाग: 2/5)"

                                गप्पा गणितज्ञाशी! (भाग: 2/5) --
                               ----------------------------

     तरीसुद्धा शिक्षक कसे काय टिकून राहतात?

     सकारात्मक दृष्टी असलेले अनुभवी शिक्षक वाईटातूनच काही तरी चांगले शोधण्याच्या प्रयत्नात असतात. व व्यवस्थेला शरण जात आपला कार्यभाग संभाळून घेतात. अनुभव नसलेले गटांगळ्या खात काही तंत्र वापरून (काही वेळा चमचेगिरी करून) अस्तित्व टिकवून ठेवतात.

     नवीन शैक्षणिक धोरणाविषयीचे आपले मत...

     नववीपर्यंत परीक्षा नको म्हणून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलताना नववीच्या परीक्षेत नापासांची संख्या वाढणार हे लक्षात घेतले जात नाही. काही तरी उलट सुलट धोरणं परस्पर ठरवून तथाकथित शिक्षण तज्ञ निवृत्त होऊन स्वत:च्याच धोरणावर शेरेबाजी करत टीव्हीवर मुलाखत देतात. परंतु यांच्या या धरसोड वृत्तीमुळे, चुकीच्या धोरणामुळे व अर्धवट अंमलबजावणीमुळे पिढ्या बरबाद होत आहेत हेच कुणाच्याही लक्षात येत नाही.

     तुम्ही शिक्षकीपेशा सोडण्याच्या विचारात आहात का?

     अजून तरी नाही. परंतु कुठलेही उत्तेजन नसलेली, गुणवत्तेची कदर नसलेली ही किडलेली व्यवस्था कधीतरी मला पर्यायी विचार करण्यास भाग पाडणार हे मात्र नक्की. मीसुद्धा खाजगी शाळेत जायचा विचार करेन. कदाचित तेथील व्यवस्था एवढी वाईट नसेल.

     वाईट शिक्षकांना नोकरीवरून कमी करणे शक्य आहे का?

     'वाईट'ची व्याख्या कसे करणार यावर ते सर्वस्वी अवलंबून आहे. विद्यार्थ्याला 'शिक्षा' देताना तो अपंग झाला वा काही तरी विपरीत घडल्यास त्या शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्याची शिफारस करता येईल. काही काळ पूर्ण पगारावर त्याचे निलंबन होईल. विचारणा चवकशी, इत्यादी सोपस्कार पूर्ण होईपर्यंत बराच काळ निघून जाईल. त्यामुळे इतर शिक्षक यातून काही 'धडा' शिकून सुधारतील याची शाश्वती नाही. वाईट शिक्षक म्हणजे शिक्षकी पेशासाठी नालायक, शिकविण्याची क्षमता नसलेला वा विद्यार्थ्यांना परिक्षार्थी बनविणारा असे वाटत असल्यास त्याला कधीच नोकरीवरून काढले जाणार नाही.

     शिक्षणव्यवस्थेत पैसा जास्त ओतल्यास सुधारणा होईल का?

     हा एक चुकीचा समज आहे. शिक्षणातील भोंगळ कारभाराला, शिक्षकांचा अपुरा पगार वा वाईट शिक्षक जबाबदार नसून चुकीच्या गोष्टीवर भर देणाऱ्या व त्या हट्टापायी विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या चांगले तज्ञच जबाबदार आहेत, हे माझे स्पष्ट मत आहे.

     उदाहरणार्थ.....

     शाळेत आलेला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर वा इंजिनीयर होत नसतो म्हणून विद्यार्थ्यांना किमान लिहिता वाचता आले तरी पुरेसे आहे या (कु)तर्कामुळे संपूर्ण व्यवस्था फक्त लिहिता वाचता येण्यासाठीच राबवली जात आहे. पाठ्यक्रमात, पाठ्यपुस्तकात किमान गोष्टीवरच भर दिला जात आहे. जास्तीत जास्त विषयावर कमीत कमी शिकविण्याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे शेवटी शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला काहीही ज्ञान नसते. शालेय शिक्षणानंतर प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले पाहिजे या हट्टापाय़ी कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला नापास करायचे नाही असा अर्थ घेतला जात आहे. चुकीचे उत्तर बरोबर कसे यासाठी कसरत करणाऱ्या परीक्षकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षणाचे सुमारीकरण होत आहे.

--प्रभाकर नानावटी
(January 31, 2013)
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.02.2023-बुधवार.
=========================================