दिन-विशेष-लेख-दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन-B

Started by Atul Kaviraje, May 21, 2023, 11:17:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                            "दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन"
                           --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-21.05.2023-रविवार आहे, 21 मे हा दिवस "दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     विशेषतः दहशतवादाचे स्वरूप असे असू शकते- संघटित, नियोजित व हिंसात्मक कृती करणे, राजकीय हेतूने प्रेरित होणे, बळजबरी व धमक्या देण्यासाठी शस्त्रांचा वापर करणे, लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असणे, लोकशाही विरोधी कृत्य घडविणे, मानवीहक्कांचा भंग करणे. याच गोष्टी स्थानिक ते वैश्विक स्वरूप धारण करू शकतात. यास कारणीभूत काही ढोबळ कारणे अशी: १) आंतरराष्ट्रीय कारणे- राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहशतवाद अंगीकारला जातो. मूलतत्त्ववादी व धार्मिक कट्टरवादी हे दहशत निर्माण करून आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्त्वांचा अंगीकार करू इच्छितात. छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना फायदेशीर वाटतो. लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ- पाकिस्तानचा काश्मीरमध्ये चालू असलेला सरकार पुरस्कृत दहशतवाद. वाढते नागरिकीकरण व शहरीकरण यामुळे होणारा त्रास. २) सामाजिक कारणे- बेकारी, सामाजिक असुरक्षिततेची भावना, सुसंवादाचा अभाव, दुसऱ्याबद्दल संकुचित वृत्ती व स्पर्धात्मक भावना ठेवणे. ३) आर्थिक कारणे- दारिद्र्य, लुटारू वृत्ती व पैशाची हाव, अमली पदार्थाची तस्करी, आर्थिक विषमता तसेच विकासातील विषमता, काळा पैसा आदी. ४) राजकीय कारणे- सत्ताकांक्षा, शासनाची उदासीन प्रवॄत्ती व फुटीरवादी चळवळीस प्रोत्साहन, सरकारकडून अपेक्षाभंग, राजकीय बजबजपुरी इत्यादी. ५) तांत्रिक कारणे- अत्याधुनिक शस्त्रे व साधने यांची सहज उपलब्धता, आधुनिक दळणवळण सुविधा व प्रगत संदेशवहन सहज शक्य होणे आदी. ६) इतर कारणे- लोकशाही व्यवस्थेचा अभाव, असहिष्णुता, धार्मिक व वंशिक विद्वेष इत्यादी सांगता येतील.

     या व अशा उपद्व्यापामुळे मानवास भोगावे लागणारे दुष्परिणाम असे- दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते. संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते. दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते. राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते. दहशतवादाची शिकार झालेल्या बांधवांची कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात. एकूणच राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते. आजच्या स्थितीला संपूर्ण जगात ज्या-ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यापैकी सर्वात मोठी व अवघड समस्या म्हणजे दहशतवाद व हिंसाचार आहे. या दहशतवादामुळेच संपूर्ण जगाची शांतता भंग पावली आहे. फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येने देशाची फार मोठी आर्थिक हानी केलेली आहे. दहशतवाद व हिंसाचार याचे मूळ हे धार्मिक महत्त्वाकांक्षेत आहे. आपला धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. त्या धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा, हा यामागील सर्वात मोठा हेतू आहे. त्यासाठी अत्यंत विषारी आणि विखारी प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो, म्हणून दहशतवाद निर्माण करणारी देशभर पसरलेली केंद्रे संपवणे व धर्मांधतेला प्रोत्साहन देणार्‍या संस्था, संघटनांची दुकाने बंद करणे आवश्यक आहे. झटपट श्रीमंती, वजनदारपणा, अधिकार व सत्ता हस्तगत लोलुपता याही गोष्टींना हाणून पाडणे आवश्यक राहील. यासाठी जनतेने जागरूक राहून वागले पाहिजे.

--मनोज कांबळे
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मीडिया वार्ता न्यूज.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.05.2023-रविवार.
=========================================