रक्षाबंधन-लेख-2

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:27:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

       Raksha Bandhan 2023-रक्षाबंधन कधी आहे? अधिक मासामुळे लांबणीवर गेला सण--

           Raksha Bandhan Date Muhurta And Importance--

     सर्वांना रक्षाबंधनाची आतुरता असते. पण, यावेळी तुम्हाला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागेल. यावेळी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. खरं तर, यावेळी श्रावण संपूर्ण दोन महिने असेल, तर जाणून घेऊया रक्षाबंधनाची तारीख, महत्त्व आणि शुभ मुहूर्त.

             Raksha Bandhan 2023--

     भारतातील सण व उत्सवांपैकी रक्षाबंधन हा सण महत्वाचा आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा करतात. राखी म्हणजे राख अर्थात रक्षण कर व सांभाळ कर असा होतो. दरवर्षी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन घेते, अशी प्रथा आहे. बहिण-भावाचे नाते भांडणाचे, खोडीचे असले तरीदेखील या नात्यात पवित्र प्रेम आणि भावना असते. हे प्रेम जपण्यासाठी आणि नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन जगभर साजरी करण्यात येते.

                रक्षाबंधन तिथी आणि मुहूर्त--

     हिंदू पंचांगानुसार, यावेळी बुधवारी, ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधू नये, हे ध्यानात ठेवावे. वास्तविक, भद्रकालमध्ये अशुभ मुहूर्त आहे. म्हणूनच बहिणींनी आपल्या भावांच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी.

     पौर्णिमा तिथी ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटापासून सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८ वाजून ३५ मिनिटापर्यंत असेल.

               रक्षाबंधनाचे पौराणिक महत्व--

     एकदा दानवांचा राजा वृत्रासुर याने इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. इंद्रदेवाला विजय मिळावा यासाठी पत्नीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. हा दोरा म्हणजेच राखी होय, या राखीने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि इंद्राचे गेलेले वैभव त्याला पुन्हा मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, अशी हिंदू परंपरेत मान्यता आहे.

     महाभारतात श्रीकृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम झाल्याने रक्त वाहत होते. यावेळी द्रौपदीने तिच्या साडीची किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधली यामुळे त्याचा रक्तस्राव थांबला. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रोपदीचे आजीवन रक्षण करण्‍याचा संकल्प केला, असे महाभारतात सांगितले आहे.

               नारळी पौर्णिमा--

     यंदा ३० ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले जाते.

--प्रियंका वाणी
-------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================