"वास्तविक संपूर्ण शिवचरित्र अद्याप इतिहासकारांना गवसलेलंच नाही. लक्षावधि कागदपत्रे अजून अंधारातच आहेत. अज्ञानामुळे आणि अनास्थेमुळे अगणित कागदपत्रे नष्ट होत आहेत. कुणी पाणी तापविण्यासाठी त्यांचे जळण करत आहे, कुणी फटाकडे करण्यासाठी ती वापरीत आहे; कुणी ताबूताला ती अस्तर म्हणून चिकटवत आहे. वाळवीच्या किड्यांचा उदरनिर्वाह मुख्यत: या ऐतिहासिक कागदपत्रांवरच चालतो म्हणे! आळस, अज्ञान व अनास्था ह्या तिघांचं प्राबल्य आमच्या जीवनात पसरलेलं आहे. इतिहास म्हणजे अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय धनदौलत आहे."
-- बाबासाहेब पुरंदरे