त्याच्यासाठी आज खूप महत्वाचा दिवस होता. गोष्टच अशी होती. आज त्याच लग्न होतं! आईवडिलांचं घर सोडून आज तो सासरी जाणार होता. आई वडिलांचा एकुलता एक, लाडाकोडात वाढलेला.. त्याचं घर म्हणजे त्याचं विश्व होतं. त्याच विश्वाचा आज त्याला रामराम घ्यायचा होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आदल्या रात्री सामान pack करताना त्याला ब्रम्हांड आठवलं होतं. जितकं शक्य होतं ते सामान त्याने ब्यागेत भरून घेतलं होतं पण आठ्वणींच काय? त्या भिंती.. ज्यावर त्याने लहानपणी A B C D लिहिलं होतं, तो बेड जो फक्त त्याचा आणि त्याचाच होता, ती भिंतीवरची फोटोफ्रेम ज्यावर त्यांचा family photo होता आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्याचे आई-बाबा. जे त्यासाठी दैवत होते. आज सगळच त्याला पारखं होणार होतं कारण आज त्याचं लग्न होतं आणि तो सासरी जाणार होता.
जुन्या आठवणी मनात दडवून नवीन आयुष्याची स्वप्नं घेवून त्याने सासरी गृहप्रवेश केला. एका नवख्या घराला त्याला आता आपलं घर मानायचं होतं. बायकोच्या आई वडिलांना प्रेमाने आई बाबा म्हणायचं होतं. काम तसं अवघडच होतं!
लग्नाचे नव्या नवलाईचे दिवस आता संपले होते आणि वास्तवाला सुरुवात झाली होती. हनिमून आटपून कालच ते आपल्या घरी आले होते. आज लग्नानंतर ऑफिसला जायचा त्याचा पहिला दिवस होता. याला ९ वाजेपर्यंत बिछान्यावर लोळायची सवय होती तर बायकोच्या घरी सगळे ५ वाजता उठून आपआपली कामं उरकत असत. तिथे आईने हातात चहाचा कप आणि पेपर दिल्याशिवाय याचा दिवस सुरु होत नसे. बायकोने याला आधीच क्लिअर केल होतं तुझ्यासारखेच मला २ हात आणि २ पाय आहेत, तुझ्यासारखी मीही ऑफिसला जाते तेव्हा तुझी कामं तू कर माझी मी करेन. बायको ५ वाजता उठली कि स्वताच सगळं आवरून याला ६ वाजता उठवत असे. तिथे सासर्यांनी सकाळी देवपूजेची जबाबदारी आपल्या लाडक्या जावयावर टाकली होती त्यांना म्हणे आता घरच्या जबाबदार्यांमधून निवृत्त व्हायचं होतं. सकाळी लवकर उठून देवपूजा आटपून ऑफिसला जाताना याची नुसती तारांबळ उडत होती. अचानक अंगावर पडलेल्या असंख्य बदलांनी तो पुरता भांबावला होता. एवढच नव्हे तर त्याचं सासर आणि माहेर यांच्या रहाण्या, वागण्या-बोलण्याच्या आणि जेवणाच्या सवयींमध्येहि बराच फरक होता. पावलोपावली त्याला त्याच्या घराची आणि आईची आठवण येत होती. पण त्याच सासरच आता त्याचं घर होत आणि नवीन बदलांची सवय करून घेण त्याला भाग होतं. त्याचं एकट्याचं जग आता एकट्याचं राहिलं नव्हतं तिथे आता बरीच गर्दी झाली होती, हव्या असलेल्या नात्याची आणि अंगावर पडलेल्या नात्यांची.
जेव्हा मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिलाही या सगळ्या दिव्यातून जाव लागतं. पण तीच जाण हे सगळ्यांनीच गृहीत धरलेलं असतं. नवीन घर, नवीन माणसं, त्यांना असणार्या बर्यावाईट सवयी या सगळ्याशी तिला मिळतंजुळतं घ्यायच असतं. हल्लीची बहुतेक मुलं समंजस असत्तात, आपल्या बायकोची होणारी हि घालमेल त्यांना समजलेली असते म्हणूनच ते तिला नवीन घरी रुळायला सर्वोतोपरी मदत करतात. पण ज्यांना अजूनही हे उमगलेल नाही त्यांनी जरा स्वताला या Mad Angle मधून पाहून बघा.
शीतल
http://designersheetal.blogspot.com
http://kaladaalan.blogspot.com