मी आत गेलो तर मालक स्वच्छ पांढ-या लुंगीत कपाळावर पांढ-या गंधाचे उभे आडवे पट्टे ओढुन दोन्ही हात कोप-यापासुन जोडुन माझ्या स्वागताला उभे होते. मी पण त्यांच्याकडे पाहुन तसाच नमस्कार केला. तर त्यांनी 'घालीन लोटांगण'सारख्या टाळ्या वाजवत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली. मी पण.
त्यांनी कानाला हात लावला. मी पण.
त्यांनी नाकाला हात लावला. मी पण.
मग त्यांनी २-४ थोबाडीत मारुन घेतल्या. मी पण.
ते अचानक दोन पायांवर खालीच बसले. मी नाही.
मी तिथल्याच एका रिकाम्या टेबलावर हळुच बसुन घेतलं.... ते एकदम ओरडुन म्हणाले " एन्डेश्वरा इनीक्य इन्न ओत्तरी आळकारं एन्डे हॉटॆली वेरानपाडआ ".
मी जाम घाबरलो. बहुतेक मी खाली न बसल्यामुळे ते चिडलेत असं वाटुन मी घाबरुन खाली बसलो. पण ते माझ्यासाठी नव्हतंच. त्यांची पुजा चालली होती. ती थोड्या वेळानी संपली आणि ते दरवाज्यातल्या फोटोंकडे वळाले.
बराच वेळ माझ्याकडे कुणीच फिरकलं नाही आणि ती प्रतिक्षा मला सहन होईना. तो अपमान मला सहन होईना. मग भुक सहन होईना. त्याचा परिणाम माझ्या स्मरणशक्तीवर व्हायला लागला. मी गजनीतल्या आमीरसारखं किंवा कुठल्याही पिक्चरमधल्या सुनीलशेट्टीसारखं बधिर चेह-यानी इकडे तिकडे पाहायला लागलो. माझा भांबावलेला चेहरा पाहुन माझ्या दिशेनी एक काळी आकृती केळ्याचं पान घेऊन येताना दिसली.
मी जरा चरकलोच. कारण मागं एकदा एका साऊथ इंडीयन मठात जेवणाचा योग आला होता. तिथं सगळं एकदम कडक सोवळ्यातलं होतं. त्यांनी माझे कपडे काढुन घेतले आणि मला नेसायला एक छोटा सोवळ्याचा पंचा दिला होता. आख्खा वेळ त्या मिनी स्कर्टमध्ये मी लाजुन चुर झालो होतो. जे समोर ताटात पडेल ते धपाधपा गिळुन बाहेर पडलो आणि ते न पचल्याने भडाभडा....... असो.
........... हा माणुस तर तो पंचासदृश्य-मिनीस्कर्टही नाही तर केळ्याची पान घेऊन येत होता. ना ना शंका-कुशंकांनी माझं मन भरुन गेलं. इथे खुप कडक सोवळं तर नसेल ना? ह्या शंकेनी तर छातीच धडधडायला लागली. भुकेनं तडफडुन मेलो तरी चालेल पण केळ्याची पानं नेसुन जेवायला बसायचं नाही, असं ठरवुन टाकलं. माझ्या अब्रुची लक्तरं मी त्याला अशी केळीच्या झाडावर टांगु देणार नव्हतो.....
त्यानी ती केळ्याची पानं आणुन माझ्या टेबलवर आपटली आणि माझ्याकडे वरपासुन खाली बघत... केळीच्या पानांकडे कडे हात करत तो म्हणाला "इद एडतो.... नंग ळेन्दो तिन्नुम....?"
मी घाबरुन त्याचा अंदाज घ्यायला लागलो. तो 'इद एडतो' म्हणाला होता का 'इथं फाडतो'... मला आठवेना. मी कपडे घट्ट पकडुन बसलो. (आणि.... 'नंग ळेन्दो' म्हणजे काय.... शी... काहितरीच....) त्या साऊथ इंडीयन दुःशासनापासुन वाचण्यासाठी मी नॉर्थ ईंडीयन कृष्णाचा धावा करायला लागलो. एक पाय टेबलाबाहेर काढुन पळुन जाण्याच्या पवित्र्यात असताना एक नजर दरवाज्यावर टाकली तर तिथं दुर्योधन हातात उदबत्ती घेउन डान्स करत होता आणि ती अभेद्य तटबंदी भेदुन जाणं शक्यच नव्हतं. पण देव धाऊन आला आणि मला स्पर्श न करताच तो दुःशासन निघुन गेला. मी पवित्रच राहिलो.
आता माझ्या स्मरणशक्तीनी दगा द्यायला सुरवात केली. दुःशासनानी जो काही प्रश्न विचारला होता त्याचं अर्थ काय आणि त्याचं उत्तर मी हो दिलय का नाही... मला काहीच आठवेना. हेच काय मी कुठल्या भाषेत बोलु शकतो हे ही आठवेना.... मालकांची पुजा संपली आणि दरवाजा मोकळा झाला. आता मी पळु शकत होतो. पण मालक गोडंसं हसले आणि म्हणाले... "वण्ण्क्कम. सावकास जेव्हा... हव्हा तेवढा ख्हा.. लिम्मीट नाय.... पन थालीत काय टाकु नका साहेब... ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो... आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय....भरपुर आनंद घ्या"
मला काय बरं वाटलं म्हणुन सांगु ! एक तर तो इसम पुणेकर मराठी नाही, साउथ इंडीयन आहे आणि मी साउथ इंडीयन नाही, पुणेकर मराठी आहे... हे मला समजलं होतं आणि दुसरं म्हणजे अनलिमिटेड थाळी !!
मी बकासुरासारखी त्या गाडीभर अन्नाची आणि ते घेऊन येणा-या आण्णाची वाट बघायला लागलो.
ब-याच वेळानी तो दोन्ही हातात काहितरी पांढरं पांढरं मूठ भरुन घेऊन आला. मी लाजत म्हणालो, अरे उगाच कशाला रांगोळी वैगेरे... त्यानी ते केळ्याच्या पानावर वाढलं. एवढं मीठ तर मी जन्मापासुन अगदी कालपर्यंत खाल्लं नसेल.... ते इतकं का वाढलं ते कळालं नाही.... मग तो गेला आणि सुमारे १६ वाट्या घेऊन आला. तिथं आठ टेबल्स होती. म्हणजे प्रत्येकी दोन दोन... पण तो इसम सगळ्या वाट्या माझ्याच टेबलवर ठेऊन गेला... आज त्यांचा भांडी घासायचा माणुस आला नसावा. थोड्या प्रयत्नांनी त्या वाटीत काय होतं हे सांगता आलं असतं.... असो....
"ये क्या है ?" - त्यानी माझ्या टेबलावर मांडलेल्या रुखवताकडे बघत मी विचारलं. "अर्रे.. आपीच तो बोला के स्पेशल साऊथेंडीयेन थाली" त्यानी माहिती वाढली.
हे मी कधी बोललो होतो कुणास ठाऊक. पण मी एकदम खुष झालो. थाळी म्हणजे जास्त काही रिस्क नसते. थोडं फार इकडे तिकडे. हे नाही आवडलं तर ते. हि भाजी नाही आवडली तर ती. पोळी नाही आवडली तर पुरी. रस्सा नाही आवडला तर सुकी भाजी. भात आपण खात नाही पण त्याबदल्यात थाळीवाले एक्स्ट्रॉ पोळ्या देतातच की.... जेऊन माणुस तृप्त झालाच पाहिजे....
भुकेनी माझ्या पोटातुन गुरगुर आवाज यायला लागले. मला पण गुरगुरवांसं वाटायला लागलं. पण ते काम मालक करत होते. दरम्यानच्या काळात एक नविन कस्टंबर आलं आणि माझ्या समोरच्या टेबलवर बसलं. त्यानी बसल्या बसल्या ऑर्डर दिली आणि त्यालाही एक केळीच पान आणि १६ वाट्या मिळाल्या. म्हणजे माझ्या टेबलवरच्या वाट्या माझ्याच होत्या....
मी अर्जुनासारखी लढायच्या आधिच कच खाल्ली. पण माझा पराभूत चेहरा पाहुन भगवान श्रीकृष्ण त्या हॉटेल मालकांच्या रुपाने पुन्हा धाऊन आले.
नाही... त्यांनी वाट्या कमी केल्या नाहीत, तर त्यांनी मला त्यांच्या नियमाची आठवण आणि युद्धाची जाणिव करुन दिली. "ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो... आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय....भरपुर आनंद घ्या"
मी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि माझ्याच पचनशक्तीला आवाहन केलं. १६ वाट्या म्हणजे सुमारे सहा ते आठ पोळ्या..... कमरेचा आव्वळ पट्टा थोडा सैल करुन मी आनंद घ्यायला तय्यार झालो !
तो गेलेला माणुस एक मोठ्ठी परात घेऊन आला. मी पुन्हा लाजलो कारण मगाशीच मी पहिलं कस्टंबर असल्यामुळे मालकांनी मला उदबत्तीनी ओवाळलं होतं. मला वाटलं की आता 'बोहोनी' म्हणुन परातीत माझे पाय धुतात की काय....
पण नाही हो..... त्यांनी त्यापेक्षा वाईट केलं होतं. माझ्यावर आकाशच कोसळलं होतं.... पेपर फुटला आणि सत्वपरीक्षेत मी नापास झालो होतो.... मग धरणी दुभंगली आणि मी आत गाडलो गेलो.... दुर्योधन आणि दुःशासनानी डाव साधला होता... भर सभेत मला.... .........................!
त्या दुःशासनानी माझ्या वस्त्राला हात घातला असता तरी मला चाललं असतं पण त्यानी स्पेशल साऊथ इंडीयन थाळीवाल्या परातीला हात घातला आणि त्या परातीतला डोंगर माझ्या पानावर उलटा केला....
...भाताचा डोंगर.... !!
त्या १६ वाट्यापण नानाविध प्रकारच्या, रंगांच्या, प्रतीच्या, चवीच्या, आकारमानाच्या, वासाच्या, भासाच्या, त्रासाच्या द्रवांनी भरुन गेल्या.... समोरचा कस्टंबर तर त्या स्पेशल थाळीवर तुटुन पडला होता. त्या महाकाय डोंगराचे त्यानी १६ मोठ्ठे मोठ्ठे गोळे केले होते. प्रत्येक गोळ्यावर तो एक वाटी उलटी करायचा आणि तो ढीग तोंडाची गुहा उघडुन आत सोडुन द्यायचा.... धडाम...!
प्रत्येक घासाला होणारा मच्याक-मच्याक आवाज आणि दर तीन घासानी त्याचा 'आसमंत हदरवुन टाकणारा' ढेकर ह्यानी मला मळमळायला लागलं..... हॉटेलचा नियम तो तंतोतंत पाळत होता. तो आनंद घेत होता आणि तेही काहीही वाया न घालवत... अगदी त्या गुहेच्या दरवाज्यातुन निसटलेला एखादा रस्श्याचा ओघळही त्याच्या हनुवटीवरुन खाली कोसळला तरी त्याच्या मांडीपर्यंत पोहचायच्या आधिच तो झेलायचा आणि चाटुन टाकायचा....
माझ्या सहनशक्ती आणि स्मरणशक्तीनी तर साथ सोडलीच होती आणि आता मी फक्त पचनशक्तीच्या भरवशावर जिवंत राहु शकलो असतो. पण तो भाताचा डोंगर फोडुन मी चमच्यात २०-२२ शीतं घेतली आणि मनाचा हिय्या करुन तोंडाशी आणली की तो बकासुर अर्वाच्य ढेकर द्यायचा आणि माझा चेहरा, आवेश आणि चमचा गळुन पडायचा.... ह्या गतीनी मला तो भात संपवायला सात महिने तरी लागले असते.
काहितरी करणे अपरिहार्य होते. तेवढा भात खाणं तर शक्यच नव्हतं. तेवढा काय केवढाच भात खाणं शक्य नव्हतं. मी एक मध्यम आकाराचा गोळा केला, पानाबाहेर ठेऊन त्याला नमस्कार केला आणि मोठ्यांने म्हणालो की, "देवाला !!" हे पाहुन मालक प्रसन्न हसले आणि माझा एक घास खपला होता....मग काही गोळे मी ह्या पुढील देवतात नमस्कार करुन वाटुन टाकले.
एक देवीदेवता, एक वास्तुदेवता, एक नागदेवता, एक गृहदेवता, एक निसर्गदेवता, एक कामदेवता, एक दामदेवता, एक ग्रामदेवता, एक अग्नीदेवता, एक वायुदेवता, एक सुर्यदेवता, एक वरुणदेवता, एक तरूणदेवता, एक बालदेवता, एक कालदेवता, एक जलदेवता, एक फलदेवता, एक फुलदेवता, एक कुलदेवता, एक कुळदेवता, एक मुळदेवता, एक खोडदेवता..... दोन जोडदेवता .... एक..... (ह्या पुढे काही सुचेनाच हो.... मग शेवटचे चार... रमेश देवता, सीमा देवता, अजिंक्य देवता आणि कपिल देवता...... म्हणुन ती चित्रावत संपवली. पण ह्यात २८ गोळे संपले होते.)
.....तरी अजुन बराच भात राहिला होता.