वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक. एका निराळ्या पद्धतीने छापलेले, गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, 'अरेबियन नाईट्स' सारखे त्याचे स्वरूप आहे.
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे .....