खरेतर विडंबन म्हटले की ते विनोदीच असायला हवे. पण खरेसाहेबांची "दिवस असे की.." वाचताना जाणवले की यावर एखादे रडवणारे, डोळ्यात पाणी उभे करणारे विडंबनही लिहीता येइल. सध्या गाजत असलेल्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचा प्रश्न या विडंबनातून मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे...
कृपया कवितेला छान आहे, असा प्रतिसाद देवू नये. हे लिहीताना खरोखर रडलोय मी.

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!
सावकारांच्या कर्जाखाली बुडतो…
आयुष्याला तारण ठेवूनी देतो,
या जगण्याचे कारण उमगत नाही..,
या जगणे म्हणवत नाही…..
व्याजाचे हे एकसंधसे तुकडे…
मम छाताडावर नाचे त्याचे घोडे,
या घोड्याला लगाम शोधत आहे,
परि मजला गवसत नाही…..
ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!
मी गरीब की मी दुर्दैवी कमनशिबी…
कर्ज चुकवण्या शोधतो शेकडो सबबी,
दुर्दैवाला हजार टाळू बघतो…
परि ते पिच्छा सोडत नाही…
येतो म्हणताना ओठ कापती थोडे…
तू मिटून घे पिल्लांचे माझ्या डोळे,
देहाचे अन मम, पदराला तुझीया
हे ओझे पेलवत नाही …. !
ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!
माझ्या ब्लॊगवरील या कवितेचा दुवा :
http://tinyurl.com/35jedw4त्या दुर्दैवी जिवांसाठी काहीही करु न शकणारा एक असहाय सामान्य माणुस !
ईशल्या देणेकरी