महाराष्ट्राला झालंय काय....

Started by pomadon, September 25, 2009, 09:55:12 PM

Previous topic - Next topic

pomadon


महाराष्ट्राला झालंय काय

'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा' या शिवरायांच्या सूत्राची पुरती ओळख आजही आम्हाला पटलेली नाही. 'मराठा' म्हणजे महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक. अशा प्रत्येकाला राजांनी जवळ केले. जाती-जातींमध्ये आज जो विखार दिसतो आहे, तसा तेव्हा असता तर शिवरायांचे स्वप्न साकारच होऊ शकले नसते.

.......

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर तशी उसंत मिळाली नाही. दिल्लीकर मोगल, विजापूरचा आदिलशहा, टोपीकर इंग्रज, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज अशा साऱ्यांनी मराठ्यांचे राज्य घेरलेले होेते. पण या शत्रूंची शिवरायांनी कधी फिकीर केली नाही. शिवरायांना मनोमन खंत असायची ती त्यांचे 'स्वराज्या'चे स्वप्न समजू न शकणाऱ्या तथाकथित आप्तांची. जावळीच्या चंदराव मोऱ्यांची गोष्ट साऱ्यांना माहीत असते. त्यांना शिवरायांनी कायमचे सरळ केले. पण मोरे काही एकटेच नव्हते. स्वत:ला पंचकुळी तसेच भूदेव म्हणून घेणाऱ्या अनेकांची अवलाद प्रत्यक्षात पाणी भरत होती ती या किंवा त्या शाहीत. फितुरीचा हा शाप शिवरायांच्या मृत्यूनंतरही महाराष्ट्राला भोवत राहिला. मराठ्यांचा सिंहासारखा राजा, छत्रपती संभाजी अशा फितुरांमुळे औरंगजेबाच्या तावडीत सापडला. या इतिहासाची उजळणी अशासाठी की आजही 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा' या शिवरायांच्या सूत्राची पुरती ओळख आम्हाला पटलेली नाही. आम्ही तसे वागत नाही. 'मराठा' म्हणजे महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक. अशा प्रत्येकाला राजांनी जवळ केले. त्याला स्वराज्याचे स्वप्न दिले. जाती-जातींमध्ये आज जो विखार दिसतो आहे, तसा तेव्हा असता तर शिवरायांचे स्वप्न साकारच होऊ शकले नसते.

हा महाराष्ट्राच्या ऐक्याला आणि सामंजस्याला नख लावणारा विखार गेली काही वषेर् खुद्द शिवाजी महाराजांचे नाव वापरत पसरवला जातो आहे, ही जशी दुदैर्वाची गोष्ट आहे; तशीच ती सज्जनशक्तीला किती षंढत्व आले आहे, याचे निदर्शक आहे. हा विखार पसरवणाऱ्या शक्ती केवळ वैचारिक गुंडगिरी करून थांबलेल्या नाहीत. त्या धाकदपटशा करत आहेत. धमक्या देत आहेत. घाबरवत आहेत. प्रत्यक्षात तसे वागून दाखवत आहेत. यालाच सामान्य माणूस 'मोगलाई' असे म्हणतो. ही असली 'मोगलाई' शिवरायांनी ठेचून काढली होती. आज मात्र ती स्वैर धुमाकूळ घालते आहे. या धुमाकुळीत सर्वांत मोठी हानी म्हणजे 'महाराष्ट्राचे महावस्त्र' पुरते विणले जाण्याआधीच विरते आहे. फाटते आहे. साऱ्या सुधारकांनी पाहिलेल्या स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर होतो आहे. ही अवस्था फार भीषण आहे. हा महाराष्ट्र आपला नाही, अशी हताशा वाटायला लावणारी आहे.

मुंबईजवळच्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या समितीबाबत सध्या वाद चालू आहे. या समितीचे ज्येष्ठ सदस्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांचा खरा इतिहास लिहिला नाही. त्यांनी शिवचरित्रात ब्राह्माणांचे महत्त्व (समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव) अवाजवी वाढवले तसेच शिवरायांना मुस्लिमद्वेष्टे रंगविले, असे दोन महत्त्वाचे आक्षेप सध्या घेतले जात आहेत. असे आक्षेप घेण्यात तत्त्वत: काहीच चूक नाही. तसे घेण्याला विचारस्वातंत्र्य मानणाऱ्या कुणाची हरकत असायचेही कारण नाही. प्रश्ान् असा आहे की, या आक्षेपांचा आम्ही निकाल कसा लावणार? तो विद्वानांच्या चचेर्तून, अभ्यासकांच्या लेखांतून, इतिहासकारांच्या अभ्यासातून, विचारवंतांच्या आकलनातून लावायचा की हातात दगड घेऊन? दमदाट्या करून? घृणास्पद धमक्या देऊन? शिवाय, शिवचरित्रावर असे आक्षेप घ्यायचे असले तरी ते लिहिणाऱ्या लेखकाला 'देशदोही' कसे म्हणता येईल? कोणत्याही नागरिकावर असा जाहीर ठपका पुराव्याविना ठेवणे, हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे.

जगभर इतिहास दोन प्रकारांमध्ये लिहिला जातो. एक रोमॅण्टिक इतिहास आणि दुसरा सीरियस इतिहास. 'सीरियस इतिहास' हा पुरावे, कागदपत्रे, अस्सल सनावळ्या, तो काळ पाहणाऱ्या प्रत्यक्ष साक्षीदारांचे (पारखून घेतलेले) लेखन यांच्या आधारे लिहिला जातो. थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी लिहिलेले 'शिवाजी अँड हिज टाइम्स' हे अशा गंभीर इतिहासाचे उदाहरण आहे. गजानन भास्कर मेहेंदळे हे उभे आयुष्य वेचून लिहित असलेले शिवरायांचे बृहद्चरित्र हे ही अशा सीरियस इतिहासाचे उदाहरण. बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेली शिवकथा हा रोमॅण्टिक इतिहास आहे. ते स्वत:ला शाहीर म्हणवून घेतात. इतिहासकार नव्हे. रोमॅण्टिक इतिहासात सत्यापासून ढळणे नसते, पण कथा रंगवताना येणारा सारा साज असतोे. इतिहासाच्या सांगाड्यात शाहीर प्राण फुंकून ती कथा जिवंत करतो. तशी रसरशीत शिवकथा बाबासाहेबांनी आजन्म सादर केली. 'शिवाजी' ही तीन अक्षरे हाच बाबासाहेबांच्या जगण्याचा अर्थ आणि परमार्थ आहे. त्यामुळे, शिवचरित्राच्या आकलनात काही चूक राहून गेली आहे, हे कुणी पुराव्याने दाखवले तर ती मानणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पहिले असतील. पण त्यासाठी इतिहास हे शास्त्र आहे आणि ते अभ्यासणाऱ्याची जात नव्हे तर गुणवत्ता आणि दृष्टी महत्त्वाची असते, हे कळायला पाहिजे. 'आमच्याही जातीत इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांची सत्यशोधन समिती नेमा की' असल्या नादान सूचना म्हणजे शिवराय हे केवळ आमच्या जातीचे आहेत. त्यांना इतर (जातीचे) कुणी न्याय देऊ शकणार नाही; असे म्हणणे आहे. जातांधळ्या, द्वेषमूलक राजकारणापायी आम्ही महाराजांना किती संकुचित करणार आहोत?

शिवराय इतके स्वयंभू होते की परमार्थात रमणाऱ्या कुणी त्यांना घडवण्याची जशी गरज नव्हती तसेच स्वराज्याचे चौफेर स्वप्न पाहताना लहानपणी कुणी दिलेली शस्त्रमंत्रविद्या पुरी पडणेही शक्य नव्हते. महाराजांनी कधी कुणाची जात पाहून न्यायनिवाडा केला नाही, तसेच स्वत:ला उच्चवणीर् समजून मनमानी करणाऱ्या चिंचवडच्या देवांचा मुलाहिजाही ठेवला नाही. असा शिवाजी नावाचा सूर्य म्हणजे महाराष्ट्राची चिरंजीव संजीवनी आहे. त्याच्या तेजाच्या स्फूतीर्ने महाराष्ट्र एक दिवस साऱ्या जगावर आपली चिरंतन मोहोर उमटवेल. पण या सूर्याचे नाव केवळ आम्हीच कुळपुरूष म्हणून लावू, हा कसला हट्ट? छत्रपती शिवाजी हे ढोर, महार, मांग, चांभार, ब्राह्माण, मराठा, कोळी, कोष्टी, मुसलमान, पारधी, परीट, नाभिक, कुंभार, मसणजोगी, कुणबी, प्रभू, बेरड, कैकाडी, भंडारी, रामोशी, वडार, धनगर, दरवेशी, माळी, शिंपी, सोनार, लोहार, कोल्हाटी, नंदीवाले, वंजारी यांचे आणि अशा साऱ्यांचे आहेत. जगातल्या प्रत्येक मराठी माणसाचे आहेत. आम्ही सारे शिवरायांचे औरस वारस आहोत. एकाच जातीची अस्मिता शिवप्रभूंच्या नावाशी जोडण्याला प्रत्येक विवेकी माणसाने प्राणपणाने विरोध करायला हवा. तशी ती जोडली गेली आणि इतरांना शिवरायांपासून दूर केले गेले तर महाराष्ट्र एक दिवस उद्ध्वस्त होईल. आणि नेमका हाच खेळ महाराष्ट्रात गेली काही वषेर् कधी लपून तर कधी उघड खेळला जातोय. हा खेळ खेळणारे आधुनिक पुरोगामी महाराष्ट्राचे आणि छत्रपती शिवरायांचे शत्रू आहेत. शत्रूंचा हा वेढा आता फोडून काढायलाच हवा. सूर्य कधी वस्तीवस्तीत वाटला जात नाही!



gaurig

एकाच जातीची अस्मिता शिवप्रभूंच्या नावाशी जोडण्याला प्रत्येक विवेकी माणसाने प्राणपणाने विरोध करायला हवा. तशी ती जोडली गेली आणि इतरांना शिवरायांपासून दूर केले गेले तर महाराष्ट्र एक दिवस उद्ध्वस्त होईल. आणि नेमका हाच खेळ महाराष्ट्रात गेली काही वषेर् कधी लपून तर कधी उघड खेळला जातोय. हा खेळ खेळणारे आधुनिक पुरोगामी महाराष्ट्राचे आणि छत्रपती शिवरायांचे शत्रू आहेत. शत्रूंचा हा वेढा आता फोडून काढायलाच हवा. सूर्य कधी वस्तीवस्तीत वाटला जात नाही!



Very true.....