मी आणि पावसाळा

Started by किरण गव्हाणे, November 01, 2014, 07:46:35 PM

Previous topic - Next topic

किरण गव्हाणे

 मी सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये आलो. तेव्हा फर्स्ट यीअरला होतो. आपण इंजिनिरिंगला आलो हा आनंद वेगळाच होता. आणि त्यातल्या त्यात लोणावळा.येथील सौंदर्य डोळे दिपून जातील असे होते. अप्रतिम होते. मी येथे काही विनोदी गोष्टी अनुभवल्या. जेव्हा पहिल्यांदा येथे आलो तेव्हा ते पावसाळ्याचे दिवस होते. तो पावसाळा आणि आजचा पावसाळा (म्हणजे २०१३ चा पावसाळा) यात खूपच फरक आहे. खूप फरक म्हणजे पाऊस काही वेगळा नाही. पण व्यक्तींच्या सवयी मात्र बदलल्या. म्हणजे फर्स्ट यीअरचा मी आणि आजचा मी यात फरक निर्माण झाला आहे. तो सुरुवातीचा पावसाळा. लोणावळा आणि पाऊस हे समीकरण घरच्यांना माहीतच असावं म्हणूनच फर्स्ट यीअरला घरच्यांनी माझ्यासाठी एक छत्री(की जी वाऱ्यामुळे पहिल्या १५ दिवसातच तुटली) आणि रेनकोट (की जो आज फाटलेला आहे, सुमारे तीन वर्षापासून मी तो वापरत नाही.) अशा वस्तू खरेदी करून दिल्या. फर्स्ट यीअरला रेनकोट घालून जायचो. सहाजीकच स्वत:च्या काळजीपोटी आणि घरचे सांगायचे म्हणून. म्हणजे घरचेही काळजी करतातच. आणि मीपण त्यांच्या काळजीचा मान ठेवतोच. आजही आई मला फोनवर विचारते आणि सांगतेसुद्धा की ,"रेनकोट आहे का?, छत्री घेऊन कॉलेजला जातो का?, पावसात भिजशील, आजारी पडशील, तुझ्या वडिलांना सांगून एक छत्री घेऊन द्यायला सांगू का?". मग मी विचार करतो कशाला उगाच छत्री,रेनकोट. उगाच पैसे खर्च होतील. म्हणून मी खोटंच सांगतो की,"आई माझ्याजवळ छत्री आहे,रेनकोट आहे. फर्स्ट यीअरला घेतला होता." आईला विश्वासच बसत नाही की, फर्स्ट यीअरला घेतलेली छत्री मी आजही वापरतो. पण ठीक आहे मी आईची कशीतरी समजूत काढतो. आता तुम्ही म्हणाल मी एवढं का सांगतोय. आणि एवढ्या पावसात छत्रीसाठी थोडाफार खर्च केला तर काय झालं?  हो मी खर्च करेन पण माझ्या मित्रांना वाईट वाटेलना. (मित्रांना वाईट वाटण्याचे कारण मी उगाचच सांगतो आहे. कारण मी माझ्या समाधानासाठी तसे म्हणतो. मित्रांना उलट आनंदच होईल.) सांगायचे तात्पर्य एवढेच की माझा मित्रपरिवार काही कमी नाही. कशासाठी म्हणे. जवळजवळ ४० मित्रापैकी ३० मित्रांकडे छत्री तर आहेचना. आणि या ठिकाणी जागा होतो माझा "सभ्य"पणा. मग पाऊस चालू झाला की एखाद्याच्या छत्रीत घुसून जायचं. म्हणजे मित्रसुद्धा थोड्याफार शिव्या देतात. पण ती शिवी म्हणजे विनोद होता असा विचार डोक्यात आणून शिवी विसरून जायची. आणि म्हणायचं, "अरे किती मस्त शिवी होती". झालं. शिवाय गरज आपलीच असते. दुसऱ्याच्या छत्रीमध्ये घुसणे ही आमची दुसऱ्या वर्षापासूनची सवय. कारण मी कॉम्पुटर डीपार्टमेंटचा विद्यार्थी आणि ते होस्टेल पासून लांब. त्यामुळे कॉलेजसाठी खूप दूर जायला लागते. म्हणजे कॉलेजला येईपर्यंत पुरतं ओलं झालंच म्हणून समजा. त्यामुळे एखाद्या ओळखीच्याला पकडायचं आणि त्याच्या छत्रीत घुसून जायचं. समजा एखाद्या वेळेला तो ओळखीचा नसला तरी चालेल. कधी-कधी अक्षय म्हणतो की, किरण तुझी तू स्वत:ची छत्री आणत जा. पण आम्ही पण निर्लजमसदासुखी. अजिबात ऐकणार नाही. पावसाच्या नावाखाली अजित रूमवर मस्तपैकी अंगावर ती जाड गोधडी घेऊन झोपून घेतो, तर कितीही पाऊस असला तरी अभिजित रेनकोट घालून कॉलेजकडे तहकूब करतो. आणि आमच्या नितीनची बातच निराळी. कितीही पाऊस असला तरी भिजत जाणार आणि म्हणणार, "मजाक नाही, इतक्या पावसात भिजणे म्हणजे." काहीजण उशिरा क्लासमध्ये येतात आणि काहीतरी कारण सांगून शिक्षकांना बरोबर पटवतात. त्याचं रोजचं कारण. गाडी पंक्चर झाली होती, पेट्रोल संपले होते, पाऊस होता. साधारणत: अशी खूपच मुले आहे. पण आपल्याला हे कारणच पटत नाही. माझं तर सूत्रच आहे की पाऊस आला की घुसा एखाद्याच्या छत्रीत. नाही जमलं तर बेंचवर बसून कपडे वाळविणे हे मला काही नवीन नाही.
येथे मी अनेक वेळा निरीक्षण केलेले आहे. सहाजीकच मुलींच्या बाबतीत. एका छत्रीत साधारणत: एकच मुलगी असते. तिच्या मागे एक बिनाछत्रीवाली मुलगी पावसात भिजत चालत असते, की जी त्या छत्रीवाल्या मुलीची खास मैत्रीण असते. सांगायचे तात्पर्य एवढचं की मुली मात्र स्वार्थीच असतात की, ज्या स्वत:च्या मैत्रिणीला पावसात भिजत ठेवतात. पण येथे मुलांची गोष्टच निराळी. एका छत्रीत २ पेक्षा जास्त मुले कसे मावतील याचा ते विचार करतात. म्हणजे आम्ही मुले स्वार्थी मात्र नाही. तुम्हाला वाटत असेल मी असा मुर्खासारखा काय बरळत आहे. खरतर सांगायचे तात्पर्य एवढेच की माझ्यातील "सभ्य"पणा आणि माझ्या मित्रांची आपुलकी यामुळे मी पावसाळ्यात छत्रीसाठी किंवा रेनकोटसाठी काडीमात्र खर्च करत नाही. माझे माझ्या अशा मित्रांना अभिवादन की जे माझ्यासारख्या "सभ्य" मुलासाठी छत्रीत थोडीफार जागा देतात. आणि विशेष म्हणजे कोणी मित्र मिळाला नाही तर पावसात भिजणे आणि बेंचवर बसून कपडे वाळविणे हे माझ्यासाठी काही नवीन नाही.
आणि आता वेळ आली आहे लेखाच्या शेवटाची. आता शेवट कसा करावा याचा विचार करत होतो. पण शेवट काय राहणार. शेवटी मी "सभ्य" तो "सभ्य"च राहणार आणि नवीन छत्री किंवा रेनकोट काही घेणार नाही.  आणि शेवटी काहीही झाले तरी मी दुसऱ्याच्या छत्रीत घुसणे सोडणार नाही. समजा कोणी मला त्याच्या छत्रीतून हाकलून दिले तर मी थेट  दुसऱ्याच्या छत्रीत घुसेन.

Sopan amolik

इश्क की होलिया खेलनी छोड़ दी है हमने,वरना हर चेहरे पर रंग हमारा होता ।.