II होळी II-निबंध क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:08:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                             II होळी II
                                          निबंध क्रमांक-4
                                        ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

                        होळी निबंध---

     आपला भारत देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो. लोक सणांच्या निमित्ताने एकत्र येतात, आपल्या मनातील आनंद आणि प्रेम व्यक्त करतात. याच सणांपैकी एक महत्वाचा सण म्हणजे होळी. होळी हा सण वसंत ऋतूत म्हणजे हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला रंगाचा सण म्हणूनही ओळखले जाते.

     होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन व दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. या सणामागे एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर होता. हिरण्यकश्यपू भगवान विष्णूचा द्वेष करीत असे परंतु हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद विष्णूचा परम भक्त होता. हे हिरण्यकश्यपूला आवडत नसे. म्हणून कित्येकदा त्याने बाळ प्रल्हादाला ठार मारण्याचाही प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

     शेवटी हिरण्यकश्यपूने त्याची बहिण होलिका हिला बोलावले. होलिकेला आगीतही भस्म न होण्याचे वरदान मिळाले होते. या वरदानचा फायदा उठवण्यासाठी हिरण्यकश्यपूने होलिकेला प्रल्हादाला घेऊन आगीत बसण्यास सांगितले. हिरण्यकश्यपूच्या आज्ञेनुसार होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीत बसली, भगवान विष्णूला ते आवडले नाही आणि त्याच आगीत होलिका भस्म झाली. ही कथा आपल्याला वाईटावरील चांगल्याच्या विजयाचा संदेश देते, याच दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी आपण होळीच्या संध्याकाळी होलिका दहन करतो.

     होळीच्या दुसऱ्या दिवशी लोक एकत्र जमतात व एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरे करतात. सर्व लोक आपापसातील वाद मतभेद विसरून एकमेकांना रंग लावतात. या दिवशी लोक घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात. लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात, संगीत वाजवून, नृत्य करून लोक आनंद व्यक्त करतात. सगळीकडे आनंद व उत्साहाचे वातावरण असते.

     पण आजकाल होळी साजरी करण्याचे स्वरूप बदलले आहे. आजकाल काही लोक होळीच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन करतात, अश्लील गाणी गातात, जुगार खेळतात, त्यामुळे होळीचा खरा आनंद कमी होतो. आपण असे कृत्य न करता होळी साजरी करण्याच्या खऱ्या कारणाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण एक आनंदी, उत्साही व रंगबेरंगी होळी साजरी केली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करून आपापसातील नाते मजबूत करणे, यासाठी आपण होळी साजरी करतो. म्हणून आपण हे वाईट कृत्य करणे बंद केले पाहिजे, व होळी साजरी करण्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.

     होळी हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर सर्व समाजातील लोकही आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. म्हणूनच या सणाला एकता आणि समानतेचा सणही म्हटले जाते आणि हेच या सणाचे खरे वैशिष्ट्य आहे.

--अमर शिंदे
------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-एसे ऑन मराठी.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.