लेख संग्रह-ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:41:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "लेख संग्रह"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दीपक साळुंके, यांच्या "लेख संग्रह" या ब्लॉग मधील एक संग्रहित  लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन"

                  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन--लेख क्रमांक-2--
                 ----------------------------------------------

     चरण बिळाशी जंगल सत्याग्रहात सागवान तोडून आणून त्यावर स्त्रियांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. या झेंडय़ाभोवती मैनाबाई धनगर, धोंडूबाई मस्कर, राजूताई कदम यांनी कडे करून हा झेंडा पोलिसांना उतरवू दिला नाही. ५ सप्टेंबर १९३० रोजी दस्तुरखुद्द सातारचे कलेक्टर तिथे पोहोचले. राजूताई कदमने ध्वज लावलेल्या सागवानाला घट्ट मिठी मारली. पोलिसांनी तिला प्रचंड मारहाण केली. या सत्याग्रहात ५० स्त्रियांना अटक झाली. त्यात सुलोचना जोशी, धोंडीबाई मटकर, बयना रामगर, मुक्ताबाई साठे यांचा समावेश होता. पैकी सुलोचना जोशी या येरवडय़ाच्या तुरुंगात रक्ताचे जुलाब होऊन मरण पावल्या. कमलाबाई शेडगे या तुरुंगातच बाळंत झाल्या. पण तुरुंगातील हालअपेष्टांमुळे त्यांचे बाळ दगावले. विदर्भातही व्यापक प्रमाणावर जंगल सत्याग्रह झाले. त्यात ओक कुटुंबातील तीन स्त्रियांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

     १९४० साली पुणे जिल्ह्यात सासवड, इंदापूर, नीरा या गावी स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे सभा घेऊन युद्धविरोधी भाषणे व घोषणा दिल्या. गांधीजींनी जो वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता, त्यात सत्याग्रहींची निवड गांधीजींनीच केली होती. वैयक्तिक सत्याग्रह सर्वाना खुला करावा, अशी मागणी पुणे जिल्ह्यातून व इतरही ठिकाणाहून होऊ लागली. गांधीजींच्या आदेशाची वाटही न बघता ठिकठिकाणी स्त्रिया युद्धविरोधी भाषणे देऊन घोषणा देऊ लागल्या. अनेक ठिकाणी असे उत्स्फूर्त सत्याग्रह झाले. त्यात दुर्गाबाई जोग, तानूबाई मोगी, अंबूबाई भोसले, लक्ष्मी वैद्य यांना शिक्षाही झाल्या.  अहमदनगर व सातारा जिल्हा, ठाणे, पूर्व तसेच पश्चिम खानदेशमधील ग्रामीण स्त्रियांनी उत्स्फूर्त सत्याग्रह केले. त्यातील बहुतेक सर्वानाच ३ ते ६ महिन्यांची शिक्षा झाली.

     १९४२ च्या चले जाव आंदोलनापर्यंत निरनिराळ्या आंदोलनांतील सहभागामुळे ग्रामीण महिलांनाही राजकीय जाणीव झालेली दिसते. मुळशी सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह व उत्स्फूर्तपणे केलेले वैयक्तिक सत्याग्रह या सर्वात दलित स्त्रियाही होत्या. दलितांच्या उद्धाराकरिता अथक प्रयत्न करणाऱ्या मालवणच्या म्हाळसाबाई भांडारकर, नगरच्या जानकीबाई आपटे यांनी दलित स्त्रियांनाही गांधीजींच्या चळवळीच्या मार्गावर आणून सोडले. ग्रामविकास, सूतकताई, हरिजन वस्तीतील कार्य, खादीची विक्री इत्यादी कार्यातही ग्रामीण स्त्रीचा मोठाच हातभार होता. फैजपूर काँग्रेस अधिवेशनात ग्रामीण स्त्रिया स्वयंसेविका होत्या. या अधिवेशनातली प्रदर्शने स्त्रियांनीच मांडली होती. त्यात त्यांनी खादी व कुटीरोद्योगातील वस्तूंची विक्री केली. डॉ. उत्तमराव पाटील यांची आई (अभिनेत्री कै. स्मिता पाटीलची आजी) या अधिवेशनापासून काँग्रेसच्या कामात सक्रिय झाली. त्यांना मार्शल लॉ तोडल्याबद्दल १९४१ मध्ये नऊ महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे १९४२ सालीही तुरुंगवास घडला. परंतु बऱ्याच आजारी पडल्याने त्यांना सोडण्यात आले. भूमिगत मुले व सून यांच्याशी त्यांची अखेर दृष्टिभेटही झाली नाही.

--रोहिणी गवाणकर,सौजन्य–लोकसत्ता
(सप्टेंबर 20, 2009)
---------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-लेख संग्रह.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.