मालती नंदन-स्वप्ना--लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:28:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मालती नंदन"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया,श्री अरुण वडुळेकर "मालती नंदन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्वप्ना"

                                स्वप्ना--लेख क्रमांक-4--
                               -------------------

     काहीच न बोलता तिने टाळी देण्यासाठी हात पुढे केला. ती तिची नि:शब्द प्रशंसा मला फार भावली. मग आम्ही दोघे काही वेळ तिथेच पाण्यात पाय सोडून बोलत बसलो. खरं तर बहुतेक सारं मीच बोललो. ती लक्ष देऊन ऐकत होती. मी त्या गावात का आलो हे मी तिला सांगितलं. पण तसाही तेव्हा बराच वेळ झाला होता. अशा लहानशा, शांत गावात सायंकाळची नीरवता लवकरच पसरते. नानासाहेब आणि वहिनी माझी वाट पाहत असतील याची जाणीव झाली. रंगलेल्या गप्पा संपूच नयेत असंच वाटत होतं. पण नाइलाज होता. तो तिलाही समजला आणि म्हणूनच तिने मला निरोप दिला. अर्थात पुन्हा भेटण्याचा शब्द देऊनच.

     त्या नंतर ती भेटतच राहिली. न चुकता अगदी रोजच. संध्याकाळी अंधारून यायला लागलं की ती तिथे यायची. अन् मग रात्रीचा पहिला प्रहर सुरू होईतो माझ्याशी बोलत बसायची. मीही भारावल्यासारखा तिची वाट पाहत बसायचो. तिच्या सौंदर्याने मी वेडावलो होतो. तिच्या मधाळ स्वभावाला लोभावलो होतो. मी तिच्या प्रेमात पडलो होतो हे माझं मला जाणवत होतं. तिला तसं ते जाणवून द्यावं असं खूपदा मनांत आलं. पण धीर होत नव्हता. तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता. तसंही ती स्वत:बद्दल काही बोलत नसे. त्यामुळे तिला तसं काही विचारण्याचा धीर होत नव्हता. ती कायमची माझी व्हावी असं मनोमनी वाटत होतं पण तिच्या बाजूने त्यासाठी हवा असलेला प्रतिसाद दिसत नव्हता.

     अशात काही दिवस गेले आणि ज्या कामासाठी मी त्या गावात आलो होतो ते काम संपायला आलं.नानासाहेबांनी ते तडीला लावलं. कागदपत्रांची पूर्तता झाली. तालुक्याला जाऊन महसूल उप-निबंधकासमोर सही-शिक्कामोर्तब करणे इतकेच काय ते उरले. माझ्या जिवाची तगमग सुरू झाली. मी येताना बरोबर कॅमेरा आणला होता. एक आठवण म्हणून वाड्याची, गावातल्या काही ठिकाणाची छायाचित्रे घेतली होती. आज तिचेही एकादे छायाचित्र घ्यावे आणि मनातले काय ते बोलावे असे मनाने घेतले. नेहमीप्रमाणे ती संध्याकाळी आली तेव्हा तर ती खूपच छान दिसत होती. आधी छायाचित्र घ्यावे आणि मगच मनातले सांगावे असे ठरवले. कारण माझा प्रस्ताव, माझे बोलणे तिला आवडेलच, पटेलच याची खात्री वाटत नव्हती. पण माझा विचार तिला पसंत न पडता तर तिने मला छायाचित्र काढू दिले नसते हे मात्र नक्की. तिचा नकार घेऊन जावे लागले तरी तिचे एखादे छायाचित्र तिची आठवण म्हणून मला बरोबर नेता येणार होते. म्हणून मी तसा प्रयत्न केला. तो साधलाही. पण कॅमेर्‍याच्या फ्लॅशच्या झोताने घाबरून ती जी गेली ते गेलीच. पुढच्या दोन सायंकाळी मी तिची वाट पाहिली. पण त्या दोन्ही रात्री मी विरह आणि वैफल्याच्या गर्तेत जागून काढल्या. अखेर परत जाण्याचा दिवस उजाडला. तालुक्याच्या गावापर्यंत नानासाहेब माझ्याबरोबर येणार होते. महसूल कचेरीतील कार्यवाही पूर्ण झाली की ते माघारी गावाकडे परतणार होते आणि मी पुढे पुन्हा माझ्या घराकडे. घरातून निघताना एकदा बारवेकडे जाऊन आलो. काही मधुर क्षणांच्या त्या साक्षीदाराचा जड अंत:करणाने निरोप घेतला. वाड्यातून बाहेर पाडताना नजर सगळीकडे भिरत भिरत होती. कुणाला काय विचारावे ते समजत नव्हते. इतक्या दिवसात मी तिचा ठावठिकाणा का माहिती करून घेतला नाही म्हणून मी स्वत:वरच चिडलो होतो. निघताना काळे काकूंना नमस्कार करावा म्हणून घरात गेलो. त्यांना नमस्कार केल्याशिवाय माझा तिथून पाय निघणार नव्हता. गेले दहा दिवस त्याच माझ्या जेवणा-खाण्याचे पाहत होत्या. मी वाकून नमस्कार केला. काकूंनी दही साखरेचा चमचा पुढे केला. दहीसाखर हाताच्या तळव्यावर घेताना एक विचार मनात आला, काकूंना स्वप्नाबद्दल विचारून पाहावं. त्यांना कदाचित स्वप्नाचा काही ठावठिकाणा माहिती असेलच. पण कसे आणि काय विचारावे ते सुचे ना. मी थोडा घुटमळलो.

--अरुण वडुळेकर
(SUNDAY, DECEMBER 16, 2007)
------------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मालती नंदन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.