संस्मरणीय-लिहिते व्हा !--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 11, 2022, 10:04:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "संस्मरणीय"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री सौरभ यांच्या "संस्मरणीय" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लिहिते व्हा !"

                                  लिहिते व्हा !--क्रमांक-१--
                                 ----------------------
                               
     फार वर्षांपूर्वी एक विचित्र पक्षी होऊन गेला. तो म्हणे पावसाळा आला की शेतकरी लोकांना पेरते व्हा, पेरते व्हा असा संदेश देत असे. मग शेतकरी उठत आणि पेरणी सुरु करत. आता हा पक्षी सध्या अस्तित्वात आहे की नाही आणि नसला तर शेतकर्‍यांनी या संभाव्य अडचणीतून कसा मार्ग काढला आहे कुणास ठाऊक? सध्या पर्यावरणाचे असे कंबरडे मोडलेले आहे की कोण कधी नामशेष होऊन जाईल काही सांगता यावयाचे नाही. काळ मोठा कठीण आला आहे. 'आमच्यावेळी असं नव्हतं' असं म्हणणारेही आता फारसे राहिले नाहीत यावरुनच काळ किती कठीण आला आहे, परिस्थितीने कसे गंभीर रुप धारण केले आहे याची तुम्हाला कल्पना करता येईल.

     असो. मला म्हणायचे आहे ते वेगळेच. मला असे म्हणायचे आहे की जर शेतात धान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांना असा काही संदेश कुणी देत असेल तर कागदावर कथा कवितांचे पीक घेऊ इच्छिणार्‍या "लेखकू" मंडळीना 'लिहिते व्हा!' असा संदेश का देऊ नये? तोच संदेश मी आज लेखकांना मी देऊन टाकतो.

     दरवेळेस लोक विचारतात तुम्हाला लेखन सुचते कसे हो? तुम्ही कोणत्या वेळेला लिहता? अर्थात हे लोक मला विचारतात असे मी म्हणत नाहीये. मी कुठे, मोठमोठे लेखक कुठे? उगाच गोड गैरसमज करुन घेऊ नका. बहुतांश लेखकांना हा प्रश्न विचारला जातो हे मी सांगतो आहे. मी म्हणतो लेखन सुचते कसे यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? हे म्हणजे तुम्हाला जेवण पचते कसे हो? असे विचारण्यासारखेच आहे. मला तर सुचते पटापट. मी आताच मागे दोनतीन लेख हातासरशी लिहून काढले. ग्रंथालयात गेलो, लिहला त्यावर लेख. परीक्षेला गेलो, लिहला त्यावर लेख. आता तर लिहण्यावरही हा लेख लिहायला बसलो आहे. आहे काय त्यात मोठेसे?

     त्यामुळेच लोकांना लिहायचे म्हटले की सुचत नाही याचे मला भारी आश्चर्य वाटते. ग्रॅहम ग्रीन या आंग्ल लेखकाला पण माझ्यासारखेच आश्चर्य वाटले. फरक एवढाच की त्याला आधी आश्चर्य वाटले आणि मला नंतर वाटले. पण म्हणून माझ्या आश्चर्याचे मूल्य उणावत नाही. असो. तो म्हणतो,"Writing is a form of therapy; sometimes I wonder how all those who do not write, compose or paint can manage to escape the madness, the melancholia, the panic fear which is inherent in the human situation." बघा कसे आहे? लिहणे हे एक प्रकारचे उपचारच आहेत. लिहिल्याशिवाय, काहीतरी रंगकाम केल्याशिवाय, तुम्ही जगूच कसे शकता? मनुष्यजातीला हा जो; कधी न संपणारा दुःखाचा, भीतीचा वारसा मिळालेला आहे त्यातून काहीतरी प्रसवल्याखेरीज तुमची सुटका होते तरी कशी? केवळ आणि केवळ दुःखाने भरलेल्या या निर्दय, पाषाणहृदयी जगात तुमचे चालते तरी कसे?

     कसले अफलातून वाक्य आहे पहा! आणि एवढे रोजचे जगणे जिथे एक संघर्ष होऊन बसले आहे, परिस्थितीशी दोन हात करावे लागतात तिथे तुम्हाला लिहायला सुचू नये म्हणजे कमाल आहे. लिहिता येण्याची जादू अजून तुम्हाला कळालेली दिसत नाही. लिहिण्यातले सुख काय वर्णावे? जाऊदे. सांगत बसत नाही. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही म्हणतात. ( बघा आता हे वाक्य माझ्या आधीच कुणी लिहिले नसते तर तिघेही एका चांगल्या वाक्याला मुकलो असतो. आता हे तिघे कोण? तुम्ही लेको अगदीच हे आहात. त्यात एवढे डोके खाजवण्यासारखे काय आहे? मी, पर्यायाने तुम्ही आणि पर्यायाने हा लेखही!)

--लेखक-सौरभ
(मंगळवार, ६ जुलै, २०१०)
-----------------------

                  (साभार आणि सौजन्य-संस्मरणीय.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2022-रविवार.