अनुभव... क्षण वेचलेले...-दंश--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:29:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "अनुभव... क्षण वेचलेले..."
                               -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, मनस्वी राजन यांच्या "अनुभव... क्षण वेचलेले..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दंश"

                                        दंश--क्रमांक-3--
                                       --------------

     "आरं तुमच्या आयला होऽऽऽऽ, थोबाड घीऊन बसलायसा, डॉक काय वढ्याला गेलय व्हय ईरड करायला"
सगळेजण जागेवरुनच मान मागे करुन नानाकडे बघायला लागले. नानाचा पारा आता वाढला होता. अर्जुनाची नजर जड होत होती. तो अस्पष्ट आवाजात कण्हत होता.
नाना," आरंऽऽऽऽ,इंदलकराला बोलवा, मुकादमाला सांगा, त्यांच्या ताब्यात मढी द्या आणि पहीलं अर्जुनाकडं बघा. पोरात जीव हाये. वाचवायला पायजे, उठा लौकर, हाला बिगीबिगी"
तसे दोन गडी उठले आणि इंदलकरांच्या वाड्यावर जायला निघाले. बायका परश्याच्या खोपटात गेल्या आणि आतमधुन दोन फाटके रग आणले. काही माणसांनी त्या फाटक्या रगानी परश्याचे आणि त्याच्या बायकोचे प्रेत झाकले . सगळेजण नानाकडे धावले. सगळ्यांनी नानाकडे बघून न बोलता एक प्रश्न एकसाथ विचारला होता.

     तो म्हणजे, "आता काय करायचं? परश्याचं काय करायचं?"
नाना, "मला काय अर्जुनाचं खरं वाटाना गड्यांनो, पोराचा पाय काळा पडलाय. कीडुक चावलय पायाला. कायतरी करायला पायजे. अर्जुना वाचायला पायजे".
भिका नावाचा सालदार हळुच नानाला म्हणाला, "नाना खरं तर बोलणं बरं नाय पण कुणीतरी बोलायलाच पाह्यजे. अर्जुन जरी वाचला तरी बी त्याला संभाळायचा कसा. आपल्याला रोज हाता-तोंडाची गाठ पाडायला रगात पडपर्यंत काम कराया लागतया. त्यात आजुन एक त्वांड घरात ठिवायचं म्हनजी पोटावर आणि कपाळावर बी पाय ठीवल्यासारखं झालय".

     त्याच बोलण तोडतच उत्तम सालदार बोलायला लागला, "व्हय नाना बराबर हाये भिकाच,आणि पोरगबी मोठ नाय. पाच-सात वर्षाच असल. मोठ आसतं तर ज्याच्या घरात राहील त्याच्याकडनं मळ्यात सालदार गड्याच आपल्यावाणी गुरासारख काम केल असत. ज्याच्या घरात हाये त्याला चार पैक तरी भ्यटल असत. पण तस बी नाय ना वो. म्या तर म्हणतो त्यो मुकादम यायच्या आत परश्याच्या बायकुच्या गळ्यातला गंठण काढुन घ्या. आता सगळ शेवटचं करायचयं धाव्या दिसापर्यंत. आपुन कुठुन आणायचा पैका. त्या मुकादमाचा असाबी परश्याच्या बायलीवर डोळा व्हता. त्यो भाड्या आल्या-आल्या तीच्या गळ्याला हात घालल गंठण काढायला".

     सगळ्यांनी एका स्वरात "व्हय व्हय" म्हणायला सुरवात केली. पटकन एक बाई उठली आणि परश्याच्या बायकोची मान उचलुन तिच्या गळ्यातील चार मन्यांचा गंठण काढुन घेतला, आपल्याच साडीच्या पदरात बांधुन ठेवला आणि आपल्या जागेवर जाउन बसली. नाना अर्जुनाच्या केसातुन हात फिरवायला लागला. अर्जुनाच डोळे मिटले होते. त्याच्या बंद ओठातुन त्याचा हुंकार ऎकु येत होता. त्या इवल्याश्या पोराच्या नाकावर आणि ओठावर माश्या बसत होत्या पण अर्जुनाकडे तेवढे त्राण नव्हते की त्या माश्या तो हटकुन लावेल. नाना अर्जुनाचा तोंडावरुन हात फिरवताना माश्या हटकु लागला. त्याच्या निळ्या रंगाच्या सद-याची बटण तुटली होती, त्याच शर्टाने त्याच्या तोंडातुन येणारी लाळ नाना पुसत होता. अर्धमेला जीव नानाच्या मांडीवर डोके ठेऊन आपल्या जगण्याची लढाई लढत होता. कायमच दारिद्र्या नशीबी असल्याने अर्जुनाच्या अंगात चड्डीचा पत्ता नव्हताच. कोणाचा तरी मागुन आणलेला अंगापेक्षा मोठा सदरा त्याच शरीर झाकायच काम करत होता.

     अर्धमेल्या अर्जुनाकडे बघत नाना चेतुन ऊठला," आरं द्वाडा होऽऽऽऽ, माणसाच्या जीवापरीस पैश्याचं मोठपण आलय तुम्हाला. म्या संभाळतु अर्जुनाला. तस बी म्या एकलाच भिकार, आसु द्या माझ्या जोडीला".
भिका, "आरं नाना, जमनार हाये का तुझ्यानी? तुझच वय झालया आता".
नाना,"मग काय जीव घ्यायचा का पोराचा. आर माणस हात का राकीस?"
सगळेजण शांत झाले होते. कोणी मान वर करुन बोलायला तयार नव्हते.
नाना,"कसला इचार करताय बांडगुळा हो. जावा पटदीशी आप्पा मांत्रिकाला बोलवा गावातुन. साप, ईचु त्यो उतरावतो म्हणत्यात".
उत्तम,"आवं पण अजुन इंदलकर नाय आलं. मुकादम बी न्हाय".
नाना, "आरं मालक आन मुकादम आल्यान काय अर्जुना उठुन बसणारे व्हय".
सगळ्यांना नानाचे बोलणे पटले. पटकन सायकल काढुन एक सालदार आप्पा मांत्रिकाला आणायला गेला आणि नाना अर्जुनाच्या तोंडावरच्या माश्या हटकत राहीला.

--मनस्वी राजन
(Sunday, August 28, 2011)
------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मनस्वी राजन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.