मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-145-मोबाइल नसता तर

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 10:32:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-145
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "मोबाइल नसता तर"

     आजच्या या लेखात आपण मोबाइल नसता तर या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. या निबंधालाच भ्रमणध्वनी किंवा मोबाईल बंद झाले तर निबंध मराठी म्हणूनही वापरू शकतात. तर चला सुरू करूया..

     आजचे आधुनिक युग मोबाईल व संगणकाचे युग आहे. आजचे जग मोबाईल शिवाय अपूर्ण आहे. मनुष्याने लावलेल्या शोधांमध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आजकाल दिवसाची सुरुवात मोबाईलनेच होते. व्यवसाय नातेवाईक व मित्र मंडळी शी संपर्क करण्यासाठी मोबाईल चा वापर केला जातो. तरुणांमध्ये तर मोबाईल चे चलन दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर मोबाईल नसता तर...?

     आज जर मोबाईल नसता तर आजचे हे युग आधुनिक युग म्हटले गेले नसते. कारण आजच्या आधुनिक युगाला परिवर्तित करण्यासाठी मोबाईल ची भूमिका महत्त्वाची आहे. विकासाच्या मार्गावर आज सर्वच वस्तू डिजिटल झाल्या आहेत. मोबाईल नसता तर डिजिटल क्रांती आणणे शक्य झाले नसते. कारण मोबाईलच्या च मदतीने पैश्यांची देवाण घेवाण होते. मोबाईल नसता तर नातेवाईक, मित्र तसेच व्यावसायिक लोकांना संपर्क करणे शक्य झाले नसते.

     आजकाल प्रत्येक वस्तू स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. जगभराची माहिती घरबसल्या मोबाईल मुळे मिळवणे शक्य होते. परंतु जर मोबाईल नसता तर जगात काय काय नवीन घडत आहे हे लक्षात आले नसते. ऑनलाईन शॉपिंग आज मोठ्या प्रमाणत वाढत आहे मोबाईल नसल्यावर ऑनलाईन शॉपिंग देखील करता आली नसती. आजकाल ज्या लोकांना रस्ता माहीत नसतो ते गुगल मॅप मदतीने एका जागेहून दुसर्‍या जागी पोहोचतात. परंतु जर मोबाईल नसता तर लोकांना परत परत इतरांना विचारात मार्ग शोधावा लागला असता.

     ज्याप्रमाणे मोबाईल नसण्याचे दुष्परिणाम आहेत त्याच पद्धतीने याचे काही फायदेही आपल्याला मिळाले असते. आज लोकांना अति मोबाईल वापराचे व्यसन जडत आहे. मोबाईल मध्ये दीर्घकाळ गेम खेळणे इंटरनेटचा वापर करणे यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे या सारख्या समस्या निर्माण होत आहेत. मोबाईल नसता तर या समस्या निर्माण झाल्या नसत्या. लोकांनी आपआपल्या मोबाईल मध्ये न पाहता एकमेकांशी गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवला असता.

     मोबाईल च्या मदतीने वाईट बुद्धीचे लोक हॅकिंग करून लोकांची माहिती चोरतात व त्याचा चुकीचा वापर करतात. जर मोबाईल नसते तर ऑनलाईन हॅकिंग झाली नसती. आजकाल मोबाईल मुळे ब्लॅकमेलिंग चे प्रमाणही वाढले आहे. मोबाईल नसता तर या सर्व समस्याही नसत्या. शास्त्रज्ञांचे मानणे आहे की मोबाईल फोन मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानीकारक असतात व दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू या रेडिएशन मुळे होते. जर मोबाईल नसता तर या समस्याही उभ्या राहिल्या नसत्या.

     शेवटी येवढेच सांगता येईल की मोबाईल वापराचे फायदे तर आहेत परंतु याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून मोबाईल चा कामापुरता व योग्य पद्धतीने वापर करायला हवा.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================