दिन-विशेष-लेख-गुरू तेग बहादूर शहीदी दिवस-C

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:29:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                            "गुरू तेग बहादूर शहीदी दिवस"
                           -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे.  २४ नोव्हेंबर, हा दिवस "गुरू तेग बहादूर शहीदी दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-२)

        काश्मिरी पंडितांची विनंती--

25 मे 1675 मध्ये गुरु तेग बहादूर आनंदपूर साहिबमध्ये एका संगतीत बसले होते, तिथंच काश्मिरी पंडितांचा एक गट त्यांच्या भेटीसाठी आला. पंडित किरपा राम या गटाचं नेतृत्व करत होते. त्यांनी तेग बहादूरांपुढं हात जोडले आणि त्यांना म्हणाले की, हजारो वर्षांपूर्वीचा त्यांचा धर्म धोक्यात आलाय.

औरंगजेबाने नेमलेला काश्मीरचा गव्हर्नर इफ्तेखार खान याने सगळ्यांना इस्लामचा स्वीकार करण्याची सक्ती केलीय. जो कोणी इस्लाम स्वीकारणार नाही त्यांना मृत्युदंड देण्यात येईल असाही आदेश दिलाय.

किरपा रामची ही कहाणी ऐकून गुरू तेग बहादूर यांचं मन द्रवलं, पण त्यांनी त्यांच्या विनंतीवर लगेच काही उत्तर दिलं नाही.

हरी राम गुप्ता त्यांच्या गुरु तेग बहादूर यांच्या चरित्रात लिहितात, "काश्मिरी पंडितांशी बोलताना गुरू तेग बहादूर म्हणाले, बादशाहाच्या प्रतिनिधींना सांगा की, ज्या दिवशी गुरु तेग बहादूर इस्लामचा स्वीकार करतील तेव्हा आम्हीही आमचा धर्म बदलू."

हरिराम गुप्ता लिहितात, "सर्व शीख गुरू तेग बहादूर यांना 'सच्चा बादशाह' म्हणायचे. आणि औरंगजेबाला यावर आक्षेप होता. औरंगजेबाला वाटलं की, तेग बहादूरांना आपणच खरे बादशाहा आहोत आणि भारताचा शासक नकली बादशाहा आहे असं जाणवून द्यायचं होतं. तेग बहादूरांच नाव 'बहादूर' होतं हे सुद्धा औरंगजेबाला खटकायचं. कारण हे नाव मुघल दरबारात उपस्थित मान्यवरांना उपाधी म्हणून दिलं जायचं."

शेवटी औरंगजेबाने गुरू तेग बहादूर यांना दिल्लीत आपल्यासमोर हजर करावं आणि इस्लाम स्वीकारावा अन्यथा जीव गमवावा लागेल, असे आदेश दिले.

गुरू तेग बहादूर यांनी त्यांच्या कुटुंबियांचा आणि साथीदारांचा निरोप घेतला. आणि सर्वांना सांगितलं की, त्यांच्यानंतर पुढचे शीख गुरू त्यांचे पुत्र गोविंद राय बनतील.

11 जुलै 1675 रोजी गुरु तेग बहादूर आपल्या पाच अनुयायांसह दिल्लीकडे निघाले. त्यात भाई मती दास, त्यांचे धाकटे भाऊ सती दास, भाई दयाला, भाई जैता आणि भाई उदय होते.

थोडं अंतर चालून गेल्यावर त्यांनी भाई उदय आणि भाई जैता पुढची बातमी काढण्यासाठी दिल्लीला पाठवलं.

पण पुढच्याच दिवशी त्यांना रोपड पोलीस स्टेशनचे हकीम मिर्झा नूर मोहम्मद खान यांनी मलिकपूरमधील रंघारण गावात अटक केली.

रोपडहून त्यांना आणि त्यांच्या तीन साथीदारांना कडक बंदोबस्तात सरहिंदला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील चांदणी चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. चार महिन्यांच्या या तुरुंगवासात त्यांचा आणि त्यांच्या तीन साथीदारांचा अतोनात छळ करण्यात आला.

गुरू तेग बहादूर यांचं चरित्र लिहिणारे हरबंस सिंह विर्दी त्यांच्या 'गुरु तेग बहादूर सेव्हियर ऑफ हिंदू अँड हिंदुस्थान' या पुस्तकात लिहितात,

"गुरू तेग बहादूर आणि त्यांच्या तीन साथीदारांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नेण्यात आलं. तिथं त्यांना हिंदू आणि शीख धर्माविषयी प्रश्न विचारण्यात आले. तिथं त्यांना विचारलं की, जाणवं घालणाऱ्यांसाठी आणि कपाळावर टीका लावणाऱ्यांसाठी तुम्ही तुमचा प्राण का देताय?"

यावर गुरू तेग बहादूर म्हटले, हिंदू जरी दुर्बल असतील तरी त्यांनी नानकांच्या दरबारात शरण मागितली. जर मुस्लिमांनी ही मदत मागितली असती तरीही आम्ही त्यांच्यासाठी आमचे प्राण दिले असते.

डॉ. त्रिलोचन सिंह त्यांच्या 'गुरु तेग बहादूर प्रोफेट एंड मार्टियर' या पुस्तकात लिहितात--

"औरंगजेब सकाळी 9 वाजता दिवाण-ए-आममध्ये दाखल झाला. त्याने सफेद सिल्कचा झब्बा घातला होता. त्याच्या कमरेला एक सिल्कचा कमरबंद होता त्याला रत्नजडित खंजीर लटकवला होता. डोक्यावर सफेद साफा होता. बादशाहाच्या दोन्ही बाजूला किन्नर उभे होते. याकच्या शेपटीपासून आणि मोरांच्या पंखापासून बनवलेल्या पंख्यांनी ते बादशहाला वारा घालत होते.

बादशहाला आधी शीख धर्माची माहिती देण्यात आली. त्याला हे ही माहीत होतं की मुस्लिमांप्रमाणे शीखही मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत. त्याला असं वाटत होतं की तो गुरू तेग बहादूरांना इस्लाम स्वीकारण्यास राजी करेल.

औरंगजेबाने गुरू तेग बहादूर यांना सांगितलं की, तुमचा ना मूर्तीपूजेवर विश्वास आहे, ना या ब्राह्मणांवर, मग तरीही तुम्ही यांचं प्रकरण माझ्याकडे घेऊन का आलाय?

गुरू तेग बहादूरांनी औरंगजेबाला आपल्या परीने सांगायचा प्रयत्न केला मात्र तरीही औरंगजेब काही ऐकला नाही. शेवटी दरबारात स्पष्ट करण्यात आलं की, त्यांनी एकतर इस्लाम स्वीकारावा नाहीतर मरायला तयार व्हावं.

गुरु तेग बहादूर यांना लोखंडी पिंजऱ्यात घालून बेड्या ठोकण्यात आल्या.

औरंगजेबाने गुरू तेग बहादूरांकडे बरेच दूत पाठवले, पण त्यांनी आपला मुद्दा सोडला नाही.

--Author-रेहान फझल
----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-बी बी सी.कॉम)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================