गुंता

Started by Jai dait, June 13, 2011, 09:51:20 AM

Previous topic - Next topic

Jai dait

नमस्कार मित्र-मैत्रिणिनो,  आजपासून तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक गोष्ट. गोष्ट तुमची-आमची. प्रत्येकालाच कधी ना कधी आपल्यासोबत घडली आहे, असं वाटायला लावणारी.   दर सोमवारी एक-एक भाग मी प्रसिद्ध करणार आहे. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहेन. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली, ते कळवायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया इथे पोस्ट करा किंवा मेल करा. माझा ई-मेल अड्रेस आहे: dait.jai@gmail.com        चला तर मग सुरवात करतो.     ============================================================        संध्याकाळचे सहा वाजले, तशी तिने आपली पर्स उचलली. दारातून बाहेर पडणारच होती आणि तितक्यात आईने हाक मारल्यामुळे ती थांबली. इतका वेळ घड्याळात सहा वाजण्याची वाट पाहण्यात ती कंटाळली होती आणि त्यातच निघता-निघता आईने थांबवल्याने ती आणखीनच वैतागली. 
"किती वाजेपर्यंत परत येशील?" आईने त्रासिकपणे विचारलं. एका मुलीला संध्याकाळच्या वेळी बाहेर उशिरापर्यंत राहू देणं कदाचित तिच्या विचारांत बसत नव्हतं.
"मी येईन गं लवकरच, तू काळजी करू नकोस," म्हणत ती झटकन बाहेर पडली. तिच्या डोक्यात वेगळाच गोंधळ सुरु होता. आज चिनूला भेटायला जात होती. तशी तर ती रोजच त्याला ऑफिसमध्ये भेटते, पण आज रविवार असूनही ती त्याला भेटायला जात होती. गेले कित्येक दिवस तिच्या मनात चाललेलं द्वंद्व आज संपवायचंच असा निर्धार करूनच ती निघाली होती.

चिन्मय आणि वृषाली, गेली चार वर्षे एकत्र, एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. या चार वर्षांमध्ये दोघांमध्ये  एक अनामिक नातं तयार झालं होतं. इतर सर्व त्याला मैत्रीचं नाव देत. कधी कधी दोघांना एक-मेकांच्या नावाने चिडवत, पण दोघंही मनावर घेत नसत. पण गेल्या एक वर्षापासून वृषालीच्या मनात चिन्मयबद्दल कसलीशी ओढ निर्माण झाली होती. पण तिने कधी त्याला हे सांगितलं नव्हतं. तिला ठाऊक होतं, चिनूच्या मनात तिच्यासाठी फक्त एक मैत्रीण म्हणून जागा आहे.

चिनूला भेटून काय आणि कसं बोलावं या विचारातच ती चालत चालत स्टेशनला येऊन पोचली. काही तांत्रिक बिघाडामुळे लोकल्स पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. रविवार असल्यामुळे स्टेशनवर  जास्त गर्दी नव्हती. बरीचशी माणसं आपल्या बायको-मुलांना घेऊन फिरायला बाहेर पडली होती. जून नुकताच सुरु झाला असला तरी, पाउस हजेरी लावून गेला होता. त्यामुळे एक वेगळंच सुखद वातावरण तयार झाल होतं...
ट्रेन यायला अजून अवकाश होता..वृषाली प्लाटफॉर्मवर  असलेल्या  बाकावर बसणारच होती आणि तिचं लक्ष एका कपलकडे गेलं..दोघं हातात हात घालून तिच्या दिशेने चालत येत होते. त्यांना पाहून वृषालीला तो दिवस आठवला..         एकदा शनिवारी ऑफिस मधून लवकर निघून सगळ्यांनी चौपाटीवर जायचं ठरवलं होतं. प्रीतम, अनिकेत, अथर्व, निशिता, प्रणिता, फिरोज, चिन्मय सगळेच तयार झाले होते. पण वृषालीला काही कामानिमित्त घरी जावं लागणार होतं. त्यामुळे तिने यायला नकार दिला. सगळ्यांनी तिला खूपदा समजावलं पण तिने कुणाचंच ऐकलं नाही. शेवटी चिन्मय तिला म्हणाला, ती नाही आली तर तोही नाही जाणार. आणि तो रागावून बसला. तो रागावला की त्याचा गोरा चेहरा लाल व्हायचा आणि तिला त्याची खूप गंमत वाटायची. तिने त्याला समजावून पाहिले पण तो तर ऐकेनाच. नाईलाजास्तव तिने सर्वांसोबत जायला होकार दिला. तरीही चिनू तिच्याशी बोलत नव्हता. 

  सर्वजण ऑफिसमधून निघाले तरी चिनू मागेच थांबला होता. निशिता आणि वृषाली दोघी एकत्रच निघाल्या होत्या. पण सर्वांसोबत चिनू दिसत नाही, म्हणून ती पुन्हा वर आली आणि तिने पाहिलं की चिनू एकटाच कॉम्प्युटरवर काहीतरी करत होता. तिने विचारले की काय करतोयस? त्रासिकपणे तिच्याकडे पाहत त्याने काहीच उत्तर दिले नाही. वृषालीने कान पकडून त्याच्यासमोर सॉरी म्हटले. तरी तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता. तेव्हा रागावून वृषाली निघणार इतक्यात चीनुने तिला हात धरून मागे ओढले. वृषाली पडता पडता अलगद त्याने तिला सावरून धरले. दोघांची नजरा-नजर झाली. कुणीच काही बोलत नव्हते. आजूबाजूलासुद्धा कुणीच नव्हते. हृदयाच्या स्पंदनांचा तितका आवाज येत होता. वृषालीचा हात अजूनही चिनूच्या हातातच होता. तितक्यात निशिता वृषालीला शोधत वर आली. दोघंही भानावर आले.        चौपाटीवर खूप धमाल आली. सर्वांनी खूप मजा केली. पण वृषालीचं लक्ष दुसरीकडेच होतं. सर्व मुलं पाण्यात जाऊन भिजण्याचा आग्रह करत होती, पण मुलीनी नाही म्हटलं, तरी अनिकेत आणि अथर्व  सर्वाना ओढत पाण्यात घेऊनच गेले. वृषाली जोरदार लाटांवर आपला तोल सावरण्याचा प्रयत्न करत होती. चिनू सर्वांवर पाणी उडवत होता. वृषाली नाही नाही म्हणत होती, तरी त्याने तिला चिंब भिजवून टाकले. भिजलेल्या गुलाबही ड्रेसवर ती आणखीच सुंदर दिसायला लागली होती. मग वृषालीनेही पाण्यात मस्ती करायला सुरवात केली. सर्वानीच एकमेकांवर पाणी उडवून धमाल केली.        पाण्यात खेळून दमले तसे सगळे बाहेर आले आणि वळून बसून गप्पा मारू लागले. चिनूच्या भिजलेल्या केसांतून ओघळणारे पाण्याचे थेंब मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चमकत होते. ती त्याच्याकडे तशी पाहत असतानाच चीनुने तिच्याकडे पहिले आणि डोळ्यानीच "काय" असे विचारले. तिने डोळ्यानीच "काही नाही" म्हणत मान खाली घातली. नजरेची भाषा नजरेलाच कळते. पण वृषालीच्या मनातलं चिनूला कधी कळणार होतं?        त्या रात्री वृषालीला झोप लागली नाही. एकसारखा  ती फक्त एकच विचार करत होती - चिन्मयचा! कानावर ईअरफोन्स लावून ती मोबाईलवरून रेडियो ऐकू लागली..त्यावर गाणं लागलं होतं - रैना बीती जाये.....   
   

laxmanbhandalkar

evadhich ahe ka story pudhacha part nahi ka????????

namratapatil

नमस्कार जय,
तुम्ही जी एक नवीन गोष्ट सुरु केली आहे त्याची सुरवात तर खूप छान आहे. पण पुढची स्टोरी कधी पोस्त करणार आहात?
आम्ही वाट पाहतोय.