गावची दिवाळी

Started by संदेश प्रताप, October 19, 2011, 02:16:21 PM

Previous topic - Next topic

संदेश प्रताप

लहानपणी दिवाळी गावीच साजरी व्हायची.

कोकणात जेवढ्या मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी साजरी केली जाते तेवढ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जात नाही. मुख्यता ह्या हंगामात भात कापणी जोरात चालू असते तसेच  गणपतीसाठी केलेल्या खर्चाचा आवाका एवढा असतो की दोन महिन्यात जोरदार दिवाळी साजरा करण्याची ऐपत नसते.

पण काही आठवणी नक्कीच छान होत्या!!! आमच्या लहानपणीच्या!!!

किमान चार पाच दिवस अगोदर  हळू हळू लगबग चालू व्हायची. गावठी पोहे बनवण्यासाठी गिरणी गर्दीने फुलून जायच्या. आम्ही आजी नाहीतर काकी बरोबर जमेल तेवढ भाताच बारदान डोक्यावर घेऊन गिरणीवर जायचो. आणि आपला नंबर कधी येतो त्याची वाट बघत त्या बारदानवर बसून राहायचं. गिरण चालवणारा तर आम्हा पोराना कोण तरी हीरोच वाटायचा . गिरण म्हणजे आजीच्या गोष्टीतली राक्षस जणू.   अखेर नंबर यायचा , गिरणीवाला काका पहिल्या धारेचे गरमा गरम पोहे हातावर पोसभर द्यायचा . त्या पोह्यांचा स्वाद आणि सुगंध अजूनही डोक्यात भिन्तोय. कुरकुरीत पोहे खायची वेगळीच मजा असायची.

आकाश कंदील
आज सारखे रेडिमेड कंदील तेव्हा नसायचे आणि असले तरी परवडणार कोणाला?? मग सगळी पोरं कंदील करायला बसायचो. घोटिव कागद , बांबूच्या काठ्या , झीरोचा बल्ब , गावठी पीठा पासून बनवलेली चिकट साधन. अतिशय देखणा आकाश कंदील तयार व्हायचा . आणि आम्ही समाधानाने पावन व्हायचो. घरातल्या मोठ्यानी शाबासकी दिली तर मग दुधात साखरच.

दिवाळीच्या पहाटे उठण्यासाठी तर स्पर्धा लागायची. जो कोणी पहिला उठणार त्याला २ किव्वा ५ रुपये बक्षीस मिळायचे. त्या बक्षिसाची स्वप्न बघता बघता कधी डोळा लागायचा कळायचा देखील नाही. सकाळी उठून पहिल आजूबाजूला बघायचो कोण प्रतिस्पर्धी भाऊ बहीण उठलय का??? मग आंघोळीला जायच..आजी सुगंधी उटण अंगाला चोळत असे. छान सुगंध असायचा.

आंघोळ झाली की महत्वाच म्हणजे कारीट फोडणे. त्याचा थोडासा अतिशय कडवट रस तोंडाला लावायचा एक पद्धत म्हणून.
मी आजीला एकदा विचारला सुधा तर मला बोलली की आता पुढचा आठवडा भर गोडधोड खाणार ना म्हणून कडू रस प्यायचा.

एवढ सगळ आटोपल्यावर सगळे जन जमायचे पहिल्या फराळाला ....गोडे साखरेचे पोहे , भावनागरी, लाडू, शंकरपाळया बरच काहीबाही ऐपती प्रमाणे असायच. वाड्यात प्रतेकाच्या घरी फराळ पोचवला जायचा. कोणी मुंबईकर चाकरमानी उतरला असेल तर फराळात काही खास पदार्थांची रेलचेल असायची. मैसूरकाप ज्याला मालवणी गावकरी प्रेमाने शिनेला अस म्हणतो.

संध्याकाळी दिव्यांची आरास लावून प्रतेकजन आपला फाटकेपणा लपवण्याचाचा आटोकाट प्रयत्न करत असे. आम्हा पॉरांसाठी अजुन एक महत्वाचा इवेंट असायचा तो म्हणजे भाऊबीज , आई बाबांकडून ४/५ रुपये घेऊन किवा जमवलेल्या खाऊच्या पैश्यातून बहिणीला ओवाळणी घालायची. आणि मग तिच्या नकळत पुन्हा बिचारीचे पैसे उडवायचे . बहुतेक तिला सुधा माहीत असायचं जाणून बुजून माहीत नसल्याचा आव आणायची. खर्च निखळ आनंद म्हणतात तो ह्याला . आजच्या बडेजावी नात्यां पेक्षा कितीतरी निरपेक्ष, निर्वाज्य, सहज सुंदर.

अशी आमची दिवाळी अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत चालायची. आणि घरचे आकाश कंदील अगदी फीकट रंग होई पर्यंत. आतला झीरोचा बल्ब मात्र तसाच दरवर्षी वाट बघायचा नव्या सोबत्याची नव्या आकाश कंदिलाची.......

कोणीतरी घरातलं जाणतं म्हणायचं...."हय कसली इली हा दिवाळी???, पुढल्या वर्सा पोरान्का घेवन म्हमैईक जा रे भाऊ..( माझे बाबा)...आम्ही सुधा हरखुन जायचो आणि पुढच्या वर्षीच्या मुंबईच्या झगमगीत दिवाळीची वाट बघात बसायचो....पण आज काळतय तो नुसता झगमगाट च होता खरी माया गावी आजीच्या खरखरित हाताने लावलेल्या उटन्यात होती आणि गावठी कुरकुरीत फोवात होती....



.......संदेश बागवे

kaivalypethkar

mi jya mhanagarat rahato te mahanagar nasun mahaajgar ahe jo sare gilar chalala ahe
tyane divali gilali ani bhaubijahi.

gavatalya divalicha ullekh ha manala rutnara ahe
junya athvanna taje kelya baddal dhanyavaad

संदेश प्रताप